मुंबई : विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत, नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आणि आताही करतो, असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला.
नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे-नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल, पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे, चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले.
शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली, असेही जयंत पाटील म्हणाले. नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचाः India Corona Update : देशात आज कोरोनाचे 7,554 नवे रुग्ण, तर मृतांची संख्या पुन्हा 200 च्या पार