देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेसच्या नेत्यांकडून आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आज प्रत्येक वस्तूवर जीएसटी आकरला जात असून महागाई गगनाला भिडली आहे. दरम्यान, हॉटेलमध्ये गेल्यावर तीन जण जेवले आणि त्यावर जीएसटी लागला तर चौथी व्यक्ती म्हणून मोदी जेवले असं समजा, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, यूपीएच्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव एका रूपयाने वाढले, तर भाजपाचे लोक आंदोलन करायचे. त्यांचे नेते रस्त्यावर उतरत होते. मात्र, आता इतके प्रचंड भाव वाढले असताना सर्व घरात बसून आहेत. आता त्यांना आपण जाब विचारायला पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
…तर असं समजा जेवणारी चौथी व्यक्ती मोदी होती
रोजच्या गरजेच्या वस्तूंवर जीएसटी लावण्यात येत आहे. त्यामुळे या वस्तू महाग झाल्या आहेत. आता हॉटेलमध्ये गेल्यावर तीन जण जेवले आणि त्यावर जीएसटी लागला तर असं समजा जेवणारी चौथी व्यक्ती मोदी होती, असा खोचक टोला थोरातांनी पीएम मोदींवर लगावला आहे.
ईडी, सीबीआय यांसारख्या संस्थानचा गैरवापर
दरम्यान, सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर थोरातांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ईडी, सीबीआय यांसारख्या संस्थानचा गैरवापर सुरू आहे. सरकारी यंत्रणा हाताशी धरून विरोधकांवर दबाव निर्माण केला जात असल्याचाही आरोप थोरातांनी केला आहे.
जीएसटीतून पूर्णपणे सूट असलेल्या लस्सी, दही, चीज आणि ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थ आणि गव्हाचे पीठ, गहू, तांदूळ आदी. अशा वस्तूंवर देखील तसेच पॅकबंद स्वरूपात विकल्या जाणाऱ्या किराणा सामानावर पाच टक्के दराने कर-आकारणी सुरू झाली असल्याने वस्तूंच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत.
हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबईकर मराठी चेहरा दिसत नाही!