क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी झालेल्या कारवाईत पंच असलेल्या प्रभाकर साईलने केलेला गौप्यस्फोट गंभीर असल्याचे सांगत राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी केली.
या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र तसेच व्हिडिओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपये मागितले होते. पण १८ कोटी रूपयात सौदा पक्का झाला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. त्याने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याची उच्चस्तरीय समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विशेषतः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकारच्या एजन्सींचा गैरवापर प्रचंड प्रमाणात सुरू आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा एक सुनियोजीत कट असल्याचे दिसत आहे. एनसीबीच्या कारवाया पाहिल्यावर त्या सुद्धा याच कटाचा भाग आहेत, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
आर्यन खान प्रकरणात नवे पुरावे समोर आले आहेत. मुंबई अंमली पदार्थांप्रकरणी जे गुन्हे होत आहे, त्या सर्व प्रकरणात वसुली केली जात आहे. यामुळे या प्रकरणात एसआयटी नेमून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी आज बीडमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी बोलणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
किरण गोसावीच्या अंगरक्षकानेच आर्यन खान अंमली पदार्थ प्रकणी गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. त्यातून सत्य समोर येईल. ज्यांच्याकडून पैसे वसूल केले गेले आहेत, तेही समोर येऊन बोलतील, असे मलिक म्हणाले.
बोगस केसेस तयार करायच्या, दहशत निर्माण करायची आणि श्रीमंतांना अडकवून खंडणी उकळण्याचा हा धंदा आहे. अंमली पदार्थ प्रकरणी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी गेल्या वर्षभरापासून तपास सुरू आहे. बॉलिवूडमधील कलाकारांना चौकशीसाठी बोलावून तोडपाणी सुरू आहे. आतापर्यंत एकाही अटक झालेली नाही. हा सर्व प्रकार दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून वसुली करण्यासाठी सुरू आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा – ‘मलिकांनी वानखेडेंचं चारित्र्यहनन करण्याचं काम थांबाववं; त्यांच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा’