घरताज्या घडामोडीमोदींनी देशाला तीन ‘चि’ दिले!, नाना पटोले यांचा घणाघात

मोदींनी देशाला तीन ‘चि’ दिले!, नाना पटोले यांचा घणाघात

Subscribe

कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’, हे तीन ‘चि’ दिले, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केला. भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे! परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले, अशी टीकाही पटोले यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

भाजप सरकारने देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवला आहे. देशाला या संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी काँग्रेस देशाचा आत्मा असल्याचे म्हटले असून त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत, असेही नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे. त्यांच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनीच टास्क फोर्स नेमला. मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी लसीकरणाचा सावळा गोंधळ करून ठेवला आहे. १३० कोटी जनतेसाठी सरकारने घरोघरी जाऊन मोफत लसीकरण करायला हवे होते, पण त्यांनी ते केले नाही. भारतातील लोकसंख्या विचारात घेता ३०० कोटी लसींची आवश्यकता आहे. ती लवकर पूर्ण होणे अवघड आहे. मोदी सरकारच्या कारभारामुळे लोक भयभीत होऊन जगत आहेत. लोकांची चिंता वाढली असून कोरोनामुळे देशभर चिता जळतानाची विदारक दृश्ये दिसत आहेत, असल्याचे पटोले यांनी सांगितले.

२००८ च्या जागतिक मंदीचे चटके जग सहन करत असताना काँग्रेस सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि लोकांना याची झळ बसू दिली नाही. ज्यांनी अच्छे दिन, विश्वगुरु, महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवले त्यांनी अवघ्या सात वर्षात भूतान आणि रवांडा यासारख्या देशांसमोर मदतीसाठी हात पसरवण्याची वेळ आणली, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -