शिवसेनेतील बंडखोर आमदार 24 तासांमध्ये मुंबई आल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री २४ तासांत त्यांच्या भूमिकेबाबत असा यू-टर्न घेतील का, याबाबत मला साशंकता आहे, असे म्हटले आहे.
तो शिवसेनेचा अंतर्गत विषय –
यावेळी कालच्या भाषणात उद्धवजी असे काही बोलले नाहीत. ते काही आमदारांच्या दबावाखाली असा निर्णय घेतील, असे मला वाटत नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याबाबत निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे, आमच्या हातात काहीच नाही. काँग्रेस पक्षात याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेनेला विचारले प्रश्न –
मला समजत नाही की, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार म्हणजे ते भाजपसोबत जाणार आहेत का? गुवाहाटीत शिवसेनेचे ४५ आमदार जमल्याचे फोटो पाहून शिवसेना दबावाखाली ही भूमिका घेत आहेत का? महाविकास आघाडीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे भाजपसोबत यायला तयार आहेत का? शिवसेना पुन्हा दुय्यम भूमिका स्वीकारायला तयार आहे का?, असे अनके प्रश्न त्यांनी विचारले. यावेळी त्यांनी ही भूमिका आपली वैयक्तिक आहे, असे स्पष्ट केले.