शिवसेना नेते एकनाश शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. या शिवसेना विधिमंडळातील बहुतांश आमदार गुवाहाटीमध्ये दाखल होत असल्याने शिंदे गटाचे संख्याबळ अधिक वाढतेय. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसून भविष्यातही आघाडी यशस्वीपणे काम करेल असा विश्वास काँग्रेसचे नेते व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने आज दुपारी पक्षाचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी रॉयल स्टोन येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते.
Maharashtra Congress called a meeting at Royal Stone, the residence of party leader & minister Balasaheb Thorat, this afternoon to discuss the current political situation of the state
— ANI (@ANI) June 25, 2022
बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ आणि महाविकास आघाडी भविष्यातही यशस्वीपणे काम करत राहणार हे चित्र स्पष्ट आहे, काहींचा प्रयत्न आहे की, महाविकास आघाडीमध्ये फूड पडली पाहिजे, अडचणीत आलं पाहिजे. राज्यात वेगळी परिस्थिती निर्माण झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. परंतु तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. आम्ही कायदेशीर तज्ञ्जांचे सल्ले व्यवस्थितपणे घेत आहोत. काँग्रेसची टीम पूर्णपणे काम करत आहे.
राज्याच्या कारभाराच्या दृष्टीने ज्या आवश्यक गोष्टी आहे त्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. मुख्यमंत्र्यासोबत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे. सरकार म्हणून आम्ही आजही कार्यरत आहोत. राज्यात आता कायद्याची लढाई सुरु झालेली आहे. यावर कायदेतज्ज्ञ विचार करत आहेत. महाविकास आघाडी बनवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या काँग्रेसच्या दिल्लीच्या टीमकडून मार्गदर्शन घेतलं जात आहे. सर्वांच मार्गदर्शन घेत आहे. आणि महाविकास आघाडीची कायदेशीर बाजू भक्कम आहे. असही बाळासाहेब थोरात म्हणाले.