उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नाही, ते ही बिन खात्याचे उमेदवार आहेत, दरम्यान आतापर्यंत पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि 18 आमदारांना मंत्री करण्यात आले. दुसरा मंत्रिमंडळ का करत नाही? ते सरकार पडेल या भीतीपोटी करत नाही, सरकार पडलं तर आमचे काय, म्हणून या विषयावर जनतेच नुकसान झालं तरी चालेल. सत्तेमध्ये बसून राज्य कसं विकता येईल, याच्यावरच राज्य सरकार काम करत आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते शनिवारी अकोल्यात बोलत होते.
नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र सगळ्यात महागडं राज्य झालं आहे. असे असताना राज्यातलं सरकार आणि केंद्रातील सरकार महागाईवर एक शब्दही बोलायला तयार नाही. मलाई खाण्यासाठी व राज्याची बदनामी करण्यासाठी गुवाहटीमध्ये जी काही बदनामी राज्याची झाली याचीही त्यांना काही चिंता नाही. फक्त राज्य विकण्यासाठी आणि राज्यातील जनतेच्या घामाचा पैसा खाण्यासाठी हे सरकार काम करतेय. मंत्रीमंडळाचा विस्तारही करायचा नाही आणि जिल्ह्यात पालकमंत्रीही नेमायचा नाही ही लाईन आता भाजपाने घेतली आहे. लोकशाहीला न मानणारी ही व्यवस्था आहे. त्यामुळे ज्यांना लोकशाहीच माहीती नाही, पालकमंत्रीच माहित नाही यापेक्षा दुर्भाग्य कधीही नव्हते तेवढे दुर्भाग्य भाजपने या राज्याचे करून ठेवले आहे. यासह अनेक मुद्द्यांवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधीचं पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे ही देशातील काँग्रेसची इच्छा आहे. देश संकटात आला आहे. अशा परिस्थितीत या देशाला संकटातून गांधी परिवारचं वाचवू शकतो आणि देशाला उभं करण्याची क्षमता फक्त राहुल गांधी यांच्यामध्येच आहे. त्यामुळे राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत ही सगळ्या काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.