नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या ४६ आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. त्यातच दिवसागणिक बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा आकडाही वाढत आहे. हे बघून महाविकास आघाडी (मविआ) मध्ये सामील असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे. अचानक शिवसेनेला लागलेली ही गळती शिंदे निर्मित आहे की शिवसेनेचा उद्धव ठाकरे निर्मित मास्टर प्लान असा प्रश्न आता या नेत्यांना भेडसावू लागला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार ही आता काळ्या दगडावरील रेघ असून मागील अडीच वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला आता विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी असून यामागचा चाणक्य कोण यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कारण शिंदेच्या बंडा आधीही शिवसेनेमध्ये अनेक जणांनी बंड केले होते. पण ज्यांनी बंड पुकारले त्यांच्यामागे एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही आमदार गेले नाहीत. मग असे असताना अचानक सगळ्याच आमदारांना उद्धव यांच्यापेक्षा शिंदे इतके आश्वासक का वाटू लागले आहेत असा प्रश्ना ठाकरे सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेतेमंडळींना पडला आहे. महाराष्ट्रातील या बंडाळीचे लोण दिल्लीपर्यंत पोहचल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तातडीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांची महाराष्ट्राचे निरिक्षक म्हणून नेमणूक करत त्यांना सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने मुंबईला पाठवले. त्यावेळी कमल नाथ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही हाच प्रश्न पवारांना विचारल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू आमदार देखील शिंदेकडे जात असल्याने काँग्रेस -राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही मुंबईत दाखल झाल्या आहे. त्या एका खासगी कामासाठी आल्याचे सांगण्यात येत असले तरी सोनियांना काँग्रेसच्या काही नेत्यांनी येथे काहीच आलबेल नसल्याचे सांगितले असून शिवसेनेतील ही बंडखोरी राजकीय खेळीचा भाग असण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले आहे. यामुळे त्याचीच पडताळणी करण्यासाठी प्रियांका मुंबईत आल्याचे बोलले जात आहे.