मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ ऐवजी २५ टक्क्यांपर्यंत करण्यास मान्यता दिली. त्यामुळे एकूण कार्यरत पदांच्या २५ टक्के इतक्या सर्वसाधरण बदल्या ३१ जुलै २०२१ पर्यंत करता येणार आहेत. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या एक – दोन दिवसात शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीत १५ टक्के बदल्यांच्या मर्यादेमुळे येणाऱ्या अडचणी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. १५ टक्के मर्यादेमुळे अनेक अधिकारी, कर्मचारी बदल्यांसाठी पात्र असून त्यांची बदली करता येत नसल्याने ही मर्यादा ३० टक्के करावी, अशी विनंती मंत्र्यांनी ठाकरे यांना केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सर्वसाधारण बदल्या ३० ऐवजी २५ टक्के करण्यास अनुकूलता दर्शवली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने वित्तीय भार टाळण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के मर्यादेत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास मान्यता दिली होती. या संदर्भातील शासन निर्णय ९ जुलैला जारी करण्यात आला होता.
१५ टक्के मर्यादेनुसार बदल्या करताना ज्या पात्र अधिकाऱ्यांचा वा कर्मचाऱ्यांचा संबंधित पदावर जास्त कालावधी पूर्ण झाला आहे, अशांना प्राधान्य देण्यता यावे. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर जी पदे रिक्त राहतील, त्याच पदांवर विशेष कारणास्तव १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत बदल्या करण्यात याव्यात, असेही आदेशात नमूद होते. हा आदेश कायम राहणार असून आता १५ ऐवजी २५ टक्के बदल्या होणार आहेत.