राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवासांपूर्वी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय जाहीर केला होता. मुनगंटीवारांच्या या निर्णायाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले होते. सुधीर मुनगंटीवारांनंतर आता काँग्रेसने जय बळीराजाची घोषणा दिली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराज म्हणावे, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. यासंदर्भात बोलताना वंदे मातरम् आमचा स्वाभिमान आहे. पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे, असे नाना पटोले म्हणाले. वंदेमातरमला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराज म्हणणे यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले होते –
काही दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवारांनी फोन संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्’नं करण्याचं अभियान राबवणार, असं जाहीर केले होते. नवनियुक्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्याच दिवशी मोठी घोषणा केली आणि चर्चांना उधाण आले आहे. सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम बोलण्याचा आदेशामुळे वाद रंगला. रझा अकादमीने या आदेशाला विरोध दर्शवला आहे. तर राज्याच्या राजकारणातूनही अनेक मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.