लॉकडाऊन ३ मे २०२० पर्यंत वाढले असून या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे रेल्वेचे बरेच नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत रेल्वे मंत्रालयाने १३ लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचार्यांचे वेतन आणि भत्ते कमी करण्याचा विचार सुरू केला आहे. या योजनेंतर्गत, टीए, डीएसह जादा कामाच्या शुल्कासाठीचे भत्ते रद्द केले जातील. मोटरमन आणि गार्ड यांना प्रति किलोमीटर भत्ता देण्यात येणार नाही. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कर्मचार्यांना कर्तव्य करण्यासाठी भत्ता का देण्यात यावा, लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वे आधीच आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे ओव्हरटाईम ड्युटीसाठी भत्ता ५० टक्केे कमी केला जाऊ शकतो. मेल-एक्स्प्रेसच्या ड्रायव्हर आणि गार्डच्या ५०० कि.मी.साठी देण्यात येत असलेल्या ५३० रुपयांच्या भत्त्यात ५० टक्के कपात करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, रेल्वे कर्मचार्यांचे पगार सहा महिन्यांनी कमी करण्याची शिफारस केली असून ते १० ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकतात.
रेल्वेला १ हजार ४९० कोटींचा तोटा होणार
पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे प्रवाशांच्या आरक्षणाचे परतावे करण्यात आले आहेत. २२ मार्च ते १४ एप्रिल दरम्यानच्या आरक्षित ५५ लाख तिकिटांसाठी ८३० कोटी रुपये प्रवाशांना परत करण्यात आले. त्याचवेळी १५ एप्रिल ते ३ मे दरम्यान ३९ लाख बुकिंग करण्यात आले. मात्र, यामुळे रेल्वेच्या महसुलात सुमारे ६६० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. म्हणजेच भारतीय रेल्वेला एकूण १,४९० कोटी रुपयांचा तोटा होणार आहे, असे भारतीय रेल्वेने सांगितले आहे.