मुंबई येथून गुजरात अहमदनगर येथे निघालेल्या कंटेनरला मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका परिसरात आग लागल्याची घटना गुरुवारी साडेसात वाजण्याच्या समोर आली. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तातडीने तो कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला करून ती वाहिनी वाहतुकीसाठी मोकळी करून दिली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
कंटेनर चालक सुरेश कुमार हा कंटेनर घेऊन गुरुवारी सकाळीच मुंबईतून ठाणे मार्गे गुजरात येथे निघाला होता. तो कंटेनर तीन हात नाक्यावरून पुढे घेऊन जात नाही, तोच कंटेनरच्या चालक केबिनच्या मागील बाजूला आग लागली. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. त्यानंतर घटनास्थळी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.
तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणलाही दुखापत झालेली नाही. तर तो कंटेनर हायड्राच्या साह्याने रस्त्याच्या एका बाजूला करून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्व वाहनांसाठी मोकळा करण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले.
हेही वाचा : संजय राऊतांना ईडीचे नवे समन्स, ‘या’ तारखेला उपस्थित राहावे लागणार