करोना व्हायरस महाराष्ट्रात हळूहळू हातपाय पसरत असून आता राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ७४ वरून ८९ वर पोहोचली आहे. यामध्ये तब्बल १४ रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले असून एक रुग्ण पुण्यामध्ये आढळला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचं आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, ‘हा कम्युनिटी स्प्रेड नसून रुग्णांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना लागण झाली आहे, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नका, फक्त काटेकोरपणे काळजी घ्या’, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
काल ७४ होते, आता ८९ झाले आहेत. जुने पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांच्या जवळचे नातेवाईक यात जास्त आहेत. हा काही कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही. लोकांनी अजून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सरकारने घेतलेले निर्णय पाळून शिस्तीचं पालन करायला हवं. ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये. जीवनावश्यक बाबींसाठीच लोकांनी घराबाहेर पडावं.
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
दरम्यान, मुंबईत आणखी एका करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण फिलिपीन्समधून आला होता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याची प्रकृती उपचारांदरम्यान गंभीर होती. या मृत्यूमुळे आता करोनामुळे महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या ३ वर गेली आहे.