राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरनाबाबत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधामध्ये सभा,मेळावे, आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. राज्यात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविकांनी या यात्रेला उपस्थिती लावली आहे. शासकीय नियमांना झुगारुन लावत बावधनमधील नागरिकांनी बगाड यात्रा उत्साहात साजरी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचं लौकिक आहे. भाविकांची मोठी श्रद्धा असली तरी या गर्दीमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे.
राज्यभरात कोणत्याही धार्मिक कार्यक्रम आणि यात्रेला परवानगी नसताना या यात्रेचे आयोजन कसे करण्यात आले? कोणाच्या परवानगीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले? यात्रा करण्यात आली तेव्हा परिसरात पोलीस उपस्थित नव्हते का? प्रशासन काय करत होते आणि जर तिथे पोलीस उपस्थित होते तर त्यांना कारवाई का केली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रा ही राज्यातील मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बगाड यात्रा काढू नका असे आदेश स्थानिक प्रशासनातर्फे देण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवत हजारो भाविकांच्या उपस्थित ही बगाड यात्रा करण्यात आली आहे.