महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोनावर अजूनही पूर्णपणे नियंत्रण आलेले नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज जनतेला संबोधले. आता पावसाळा येत असून फॅमिली डॉक्टरांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मी ‘माझा डॉक्टर’ नावाची नवी संकल्पना मांडली आहे. प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असतो. फॅमिली डॉक्टरला या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांच्या आरोग्याची माहिती असते. त्यामुळे मी माझ्यासोबतच्या तज्ज्ञ डॉक्टरांना घेऊन या डॉक्टरांशी संवाद साधला. मी या सर्व डॉक्टरांना आवाहन केले असून त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आता पावसाळा येत आहे. कोरोना असतानाच पावसाळ्यात विविध साथीचे आजार असतात. या दोन्हीची सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे कोविड आणि नॉन-कोविड रुग्ण ओळखणे खूप महत्वाचे आहे. कोणत्याही व्यक्तीला आरोग्य ठीक नसल्याचे वाटल्यास ती व्यक्ती सर्वात आधी माझ्या डॉक्टरकडे (फॅमिली डॉक्टर) जाते. त्यामुळे या डॉक्टरची भूमिका खूप महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
७०-७५ टक्के कोविडग्रस्तांना कोणतीही लक्षणे नसतात. तरीही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून या व्यक्ती रुग्णालयात जातात. या व्यक्तींना रुग्णालयात येण्याची आणि अगदी औषधाचीही गरज नसते. परंतु, या व्यक्ती रुग्णालयात असल्याने ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत. त्यामुळे या व्यक्तींनी घरातच किंवा घरी सोय नसल्यास सरकारी विलगीकरणाची सोय असेल त्याचा वापर करू घेतला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दुसरीकडे मृत्युदर कसा कमी करायचा हासुद्धा प्रश्न आहे. बरेचदा रुग्ण उशिराने रुग्णालयात येतो. आजार अंगावरच काढतो. या परिस्थितीत फॅमिली डॉक्टरची भूमिका खूप महत्वाची आहे. कोणत्या रुग्णाला कोणती औषधे द्यायची हे त्यांनी ठरवले पाहिजे. औषधांचा अतिरेक टाळा असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.