घरताज्या घडामोडीगर्दी रोखण्यासाठी धोरण ठरवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती

गर्दी रोखण्यासाठी धोरण ठरवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती

Subscribe

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, उद्योगांवर परिणाम होऊ देणार नसल्याची ग्वाही

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसर्‍या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली. महाराष्ट्रात रुग्ण संख्या आणि मृत्यूदर कमी होत असला तरी आणखीही कमी होण्याची गरज आहे. फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरणही वेगाने पूर्ण करीत आहोत. लसी वाया जाण्याचे प्रमाणही कमी केले आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियंत्रणात ठेवण्याबाबतची राज्याची भूमिका स्पष्ट केली. दुसर्‍या लाटेचे शेपूट अद्याप वळवळत असताना रुग्ण संख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्राच नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडताहेत, गर्दी करताहेत रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरू झाले आहे. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करते आहेच; पण केंद्रीय पातळीवरून देखील आपल्याला काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे लागेल, असे ठाकरे म्हणाले.

सेंटर ऑफ एक्सलन्सची विनंती
कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून उद्योगांना फटका बसू न देण्यासाठी तशा उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती देताना ठाकरे यांनी राज्याला ज्यास्तीत जास्त लसींचे डोसेस मिळावेत, महत्वाच्या औषधांच्या किमती नियंत्रित कराव्यात तसेच कोरोनोत्तर उपचारांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची केंद्रे सुरू करण्यासाठी केंद्राने मदत करावी, अशी विनंती केली.

- Advertisement -

उद्योगांवर परिणाम होऊ नये म्हणून काळजी
कोणत्याही परिस्थितीत यापुढील काळात कोरोनामुळे उत्पादनांवर आणि सेवांवर परिणाम होणार नाही. तसेच व्यवहार सुरू राहतील यासाठी काळजी घेण्यात येत आहे. उद्योगांसाठी कोविडविषयक टास्क फोर्स तयार केला आहे आणि मुख्यमंत्री सचिवालय त्याचे सनियंत्रण करणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. कामांच्या आणि भोजनाच्या वेळांची विभागणी, भोजनाच्या वेळांची सुद्धा विभागणी, सर्व कामगार-कर्मचारी यांचे लसीकरण, फिल्ड रुग्णालयांप्रमाणे कामगारांची तात्पुरती निवास व्यवस्था कंपनीच्या परिसरात करणे अशा सूचना उद्योगांना देण्यात आल्याचेही ठाकरे म्हणाले.

शेजारच्या राज्यातून ऑक्सिजन मिळावा
केंद्राने दिलेल्या प्रमाणानुसार विचार करता, संभाव्य तिसर्‍या लाटेत राज्याला दररोज सुमारे ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल. आम्ही २ हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित २ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन शेजारच्या राज्यातून मिळाला तर मोठी मदत होईल. भिलाई, जामनगर, बेल्लारी स्टील प्लांट या ठिकाणाहून एलएमओ महाराष्ट्राला मिळण्यासाठी केंद्राने सहाय्य करावे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ५३० पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारणे सुरू असून जिल्हानिहाय ऑक्सिजन व्यवस्थापन नियोजन केले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

औषधांच्या किमती कमी करणे आवश्यक
मोनोक्लोनल एन्टीबॉडीज हे सध्या उपचारांमध्ये प्रभावी आहे. मात्र, त्याची किंमत ५० ते ६० हजार प्रती डोस असून तिसर्‍या लाटेत ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील. याचा विचार करून केंद्र सरकारने या औषधांवर किमतीचे निर्बंध आणावेत आणि त्याची सहज उपलब्धता होईल हे पाहावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -