राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने हाहाकार घातला आहे. राज्यात नाशिक विभागाच्या कोरोना पॉझिटिव्हिटिचा रेट ३० टक्के आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी फडणवीसांनी कोरोना लसीकरणावर भाष्य केले आहे. केंद्र सरकारने लस उत्पादित कंपन्यांना अर्थसहाय्य केल्याने लस उत्पादन वाढणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लीसकरण करण्यात येत आहे. सध्या देशातील दोन लस उत्पादित कंपन्या महिन्याला १३ ते १६ कोटी लस उत्पादन घेत आहेत. परंतु केंद्र आणि राज्यांना लस देण्यात येत असल्यामुळे अखंडित लसीकरण सुरु ठेवण्यासाठी लसींचा साठा करुन १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य योग्य असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देशामध्ये एकूण लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला ३००० कोटी आणि भारत बायोटेकला १५०० कोटी रुपये दिले आहेत. यामुळे देशात लसी उत्पादनाचे संख्या वाढली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट दरमाहा १० कोटी व भारत बायोटेक ३ व ऑगस्टपर्यंत ६ कोटी लस उत्पादन करु शकतील. आपल्या देशात लीस तयार होत असून बाहेरुन किती येणार आहेत याबाबत माहित नाही परंतु देशात तयार होत असलेल्या लसीकरणामुळे आपण लसीकरण करु शकत आहोत असे फडणवीसांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने एक्सलरेटेड पद्धतीने देशात लसीकरण करायचे असेल तर राज्यांना मुभा दिली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. यामध्ये लस उत्पादित कंपन्यांकडून ५० टक्के लसीचा साठा केंद्र सरकार खरेदी करुन राज्यांना देल तर राज्य सरकारला आपल्या सोयीनुसार लसीचा साठा खरेदी करण्यात येईल असा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यामुळे आता काही दिवसांत लस उत्पादन आणि लसीकरणाचा वेग वाढणार आहे. परंतु आता लस उत्पादन करण्याचा वेग कमी आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत लसीकरणाचा वेग वाढेल आणि राज्यांना मोठ्या प्रमाणात लस मिळेल. त्यामानाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बरोबरच म्हटले आहे की, लसींचा कोठा ज्या प्रमाणे उपलब्ध होईल तशा प्रकारे ते त्यांचा पुढचा निर्णय करतील असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्याला अधिकचे २ ऑक्सिजन टॅंकर
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे २ ऑक्सिजन टँकर मिळण्याची आवश्यकता आहे. याबाबत विभागीय आयुक्तांची कंपन्यांशी बोलणे करुन दिले आहे. जामनेर आणि जिंदाल यांना २ टँकर देण्याबाबत विनंती केली आहे नाशिकला २ अधिक ऑक्सिजन टँकर मिळाल्यास गावापातळीवर ऑक्सिजन बेड तयार करण्यात येतील तसेच गावातील लोकांवर तेथेच उपचार करण्यात येतील असे केल्याने नाशिकमध्ये ताण येणार नाही. तसेच खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन पुरवठा करु शकू असे फडणवीसांनी सांगितले आहे.
पॉवरफुल मंत्र्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे
सर्व मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे परंतु आपल्या जिल्ह्यात सर्व उपाययोजना गेल्या पाहिजेत असा विचार मंत्र्यांनी केल्यास त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की आपण राज्याचे मंत्री आहोत. त्यामुळे जर असे कुठे होत असेल तर ये अयोग्य आहे. माझी सगळ्या पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या मंत्र्यांना विनंती आहे की, तुमच्या जिल्ह्याव्यतिरिक्त जे काही जिल्हे आहेत, विशेषता ज्या जिल्ह्यांत जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव आहे अशा जिल्ह्यात अधिक लक्ष द्यावे असे फडणवीसांनी सांगितले आहे.