राज्यात कोरोनाला थोपविण्यासाठी लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. पण अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावर नागरिकांचा मनस्ताप पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ पाहायला मिळाला. आज सकाळी ६ वाजल्यापासून लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती, मात्र ३ तासांनंतर सांगण्यात आले की, लस संपल्यामुळे आज लसीकरण होणार नाही आहे. यामुळे नागरिकांची झुंबड उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच पुन्हा एकदा औरंगाबाद प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून आला.
काल (गुरुवार) औरंगाबाद महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळेस मात्र १५० लसी तरी उपलब्ध होत्या. मात्र आज एकही लस उपलब्ध नव्हती आणि याची कल्पना नागरिकांना नव्हती. वयोवृद्ध नागरिकांपासून अनेक जण लस घेण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून भल्या मोठ्या रांगेत उभे होते. त्यांना ९ वाजता आज लसीकरण होणार नाही असे सांगण्यात आहे. साधे याबाबत लसीकरण केंद्रावर एकही फलक लावण्यात आला नव्हता की, लस नसल्यामुळे रांगेत उभा राहू नका आज लसीकरण होणार नाही. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आणि नागरिकांमध्ये मनस्ताप दिसला.
महापालिकेचे व्यवस्थित रित्या लसीकरणाचे नियोजन नसल्यामुळे हे सर्व उद्भवले आहे. तसेच महापालिकेच्या गलथान कारभारामुळे वयोवृद्ध लोकांना तासानतास रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच नियोजन नसल्यामुळे औरंगाबादमध्ये सातत्याने असे प्रकार घडताना दिसत आहेत. लस उपलब्ध नाही आहे, लसीकरण होणार नाही आहे याबाबत माहिती देणे औरंगाबाद महापालिकेचे कर्तव्य आहे. पण त्याचे हे कर्तव्य बजावताना महापालिका दिसत नाही आहे.
हेही वाचा – लसींसाठी राज्याला आणि केंद्राला वेगवेगळा दर चालणार नाही, अजितदादा गरजले !