राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशासह राज्यातही कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. केंद्र सरकारद्वारे हे लसीकरण सुरु आहे. परंतु राज्यात आता सर्वच नागरिकांना कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सकारने केली आहे. यानंतर केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली होती. केंद्राकडून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचे धोरण जाहीर करुन १८ वर्षांवरील नागरिकांना राज्य सरकारने लसीकरण करण्याचे सांगितले होते.
केंद्र सरकारने धोरण जाहीर जबाबदारी झटकून राज्य सरकारच्या खांंद्यावर टाकली असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांनी केला होता. केंद्राने धोरण जाहीर केल्यानंतर लस उत्पादित सीरम इन्स्टिट्यूटने लसींचे दर जाहीर केले होते. यामध्ये एकाच लसीचे तीन दर जाहीर करण्यात आले होते. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद निर्माण झाला होता.
Maharashtra Government to vaccinate all its citizens free of cost: State Minister Nawab Malik pic.twitter.com/1NTIbkUGbo
— ANI (@ANI) April 25, 2021
राज्य सरकारवर १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्याची जबाबदारी टाकल्यांमुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढणार होत्या त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी श्रीमंंतांनी पैसे देऊन कोरोना लसीकरण करावे असे आवाहन केले होते. परंतु आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लसीकरणय करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या १ मे पासून हे लसीकरण सुरु होणार असून याबाबत अधिक माहितीही वेळोवेळी दिली जाईल.
१ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये १८ ते ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचे केंद्र सरकारच्या धोरणात म्हटले आहे. यानुसार केंद्र सरकार ४५ वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार असून राज्य सरकार १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे.
दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे असेही नवाब मलिक म्हणाले. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.