राज्यात आज शनिवारपासून कोरोना लस देण्याच्या ड्रायरनला सुरूवात झाली. या संपुर्ण मोहीमेसाठी तीन महिने ते सहा महिने किंवा संपुर्ण वर्षही लागू शकतात. एकाचवेळी ही मोहीम मोठ्या लोकसंख्येसाठी राबवण शक्य होणार नाही. त्यामुळेच दोन टप्प्यातल्या लसीकरणासाठी ही मोहीम काही महिन्यांच्या कालावधीसाठी सुरूच राहील असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. पण लसीकरणाच्या टप्प्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचा नियम हा कायम ठेवावा लागेल. लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाचे संपुर्ण निच्चाटन होत नाही तोवर काळजी घ्यावीच लागेल असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. जालना येतील ड्राय रन सेंटरच्या ठिकाणी संपुर्ण सेंटरचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ड्राय रन कसा होणार ?
राज्यात चार जिल्ह्यांमध्ये ड्राय रन चालणार आहे. त्यामध्ये जालना, नंदुरबार, नागपुर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये ड्राय रन चालणार आहे. ड्रायरनच्या ठिकाणी साधारणपणे एका बुथवर १०० जणांचा समावेश या ड्राय रनमध्ये असणार आहे. प्रत्यक्ष लस दिली जाणार नसली तरीही संपुर्ण यंत्रणेच्या सोयीसाठी हा ड्राय रन आयोजित करण्यात आला आहे. यामधून काही त्रुटी किंवा उणीवा राहतात का याची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक बुथवर साधारणपणे सहा जणांची टीम नेमण्यात आली आहे. त्यामध्ये पोलिस, शिक्षक, नर्स, आशा वर्कर आणि अंगवाणवाडी सेविका यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माध्यमातून ड्राय रनसाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात येईल. त्यानंतर शिक्षकांच्या माध्यमातून कोविन एपमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा समावेश हा लस देण्यासाठी आहे का ? याची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर प्रशिक्षित अशा नर्सच्या माध्यमातून ही लस टोचण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून लस दिल्यानंतरची त्या व्यक्तीची स्थिती काही वेळ तपासण्यात येईल. त्यानंतर लसीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीला लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. हा संपुर्ण सहा लोकांचा प्रशिक्षित असा चमू आहे. येत्या काळात भरपूर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीच कोल़्ड चैन स्टोरेजसाठी लस साठवणुकीसाठी तात्पुरते बॉक्स ठेवण्यात येणार आहेत. त्यामधून लस ही ठराविक तापमानात स्टोअर करण्यात येईल. ड्रायरनच्या ठिकाणी असणाऱ्या उणीवा केंद्राला कळवल्या आहेत असेही टोपे यांनी सांगितले. लसीकरणानंतरची मानसिकता महत्वाची असून विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे असे प्रकार होता कामा नये. काही कालावधी जात नाही, तोवर काळजी घ्यावी लागेल ही मानसिकता कायम ठेवावी लागेल असेल ते म्हणाले. लस मोफत देण्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.