करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम ३१ मार्चपर्यंत आणि त्यानंतर १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या. त्यातच राज्यातील करोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता परीक्षेवरील संकट अधिकच गडद झाले आहे. त्यामुळे पुढे ढकललेल्या नववी आणि अकरावीच्या परीक्षा होतील का? या चिंतेने विद्यार्थी ग्रासले गेले आहेत. परीक्षा रद्द झाल्यास आमचे मोठे नुकसान होईल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नववी आणि अकरावी परीक्षा होण्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहेत. रुईया कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या भाविका सुपे हिने दोनवेळा परीक्षा पुढे ढकलल्याने मला आता परीक्षा होईल की नाही याची चिंता वाटत असल्याचे सांगितले. परीक्षा रद्द झाल्यास आमचे मोठे नुकसान होईल. अकरावी हा पाया असल्याने बारावीची तयारी किती झाली आहे हे आम्हाला समजणार नाही. त्यामुळे उशिरा झाली तरी परीक्षा घेण्यात यावी अशी इच्छा भाविकाने व्यक्त केली. तर विक्रोळीतील स्वप्नील पवार याने परीक्षेबाबत अनिश्चितता असल्याने बारावीच्या तयारीचे वेळापत्रक कोलमडले आहे. परीक्षा झाल्यावर सुट्टीमध्ये बारावीच्या अभ्यासाचे नियोजन केले होते, मात्र आता परीक्षेबाबत अनिश्चितता असल्याने बारावीचा अभ्यास कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नववीला असलेल्या निशा राजपुरे हिने परीक्षा लवकर व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. कारण परीक्षा उशिरा झाल्यास आम्हाला अभ्यासाची उजळणी करण्यात अडचण येईल. परिक्षेबाबत संदिग्धता असल्याने आता अभ्यासही होत नाही. त्यामुळे परीक्षा न झाल्यास आम्ही केलेली मेहनत वाया जाईल व त्याचा परिणाम आमच्या दहावीच्या अभ्यासावर होईल, असेही तिने सांगितले. तर आर्यन दळवी या विद्यार्थ्याने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे परिक्षेबाबत चिंता निर्माण झाल्याचे सांगितले. करोनामुळे सर्वाना सुट्ट्या असल्याने सर्व मुले खेळत असतात, त्यामुळे आमचे लक्षही अभ्यासात लागत नाही. त्यामुळे अभ्यास करावा की खेळावे हेच सुचत नाही. त्यामुळे परीक्षा लवकर घेण्यात यावे असे ही आर्यनने सांगितले.
नववी आणि अकरावीच्या परीक्षेबाबत करोनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम व चिंता निर्माण झाली असली तरी परीक्षेबाबतचा निकाल १५ एप्रिलनंतरच घेण्यात येईल. १५ एप्रिलनंतरची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जातील. – विशाल सोळंकी, आयुक्त, शिक्षण विभाग