राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. पण अनेकवेळा विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका होताना दिसत आहे. मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत. असा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जातो. पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक आमदार रोहित पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना यावेळी विरोधकांनाही त्यांनी हळूच चिमटा काढला आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल & त्यांना महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 7, 2020
आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंच कौतूक केलं आहे, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात, पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल आणि त्यांना महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील, तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला,” अशा शब्दात रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
सेलेब्रेटींनीही केलं कामाचं कौतुक
देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रात संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. करोनाशी दोन हात करताना त्यात कोणतीही तडजोड करायची नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. त्याचवेळी संचारबंदीच्या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही कमतरता भासू नये म्हणून ही दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या या कुशल नेतृत्वाचे सगळेच जाहीरपणे कौतुक करत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्या तत्परतेने प्रतिसाद मिळत आहे ते पाहून सारेच थक्क झाले आहेत. विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध सेलिब्रिटींनीही मुख्यमंत्र्यांची तोंडभरून स्तुती केली आहे.