कोकणातून मुंबईसह संपुर्ण देशा विदेशात पुरवठा होणाऱ्या आंब्याच्या व्यापाराची उलाढाल ही उकाड्याच्या तोंडावरच सुरू होत असते. महाराष्ट्रातूनच देशासह जगभरातील बाजार पेठांमध्ये आंब्याच्या लाखो पेठ्या दाखल होतात. कोरोनाने अनेक उद्योगांना झळ बसलेली असतानाच आंब्याचा व्यापारही त्यामधून सुटलेला नाही. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी आणि नैसर्गिक संकटांचा फटका आंबा उत्पादकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळेच यंदाच्या आंबा हंगामात कोकणचा राजा हापूस चवीला आणखी महागणार आहे. राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढ लागल्याने लॉकडाऊनच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे गतवर्षीसारखेच यंदाही आंबा उत्पादक धास्तावले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यात आता इंधन दरवाढ आणि एकंदरीत लॉकडाऊनची भीती पाहता यंदाही कोकणच्या राजावर महागाईची संक्रात येण्याची शक्यता आहे.
बदलते वातावरण, अवकाळी पाऊस, कीडरोगाचा प्रादुर्भाव आणि निसर्ग चक्रवादळामुळे आंबा कलमांना मोहर कमी आला आहे. यात हापूस आंब्याला लागणारी थंडी गायब झाल्याने आलेला मोहर गळून पडत आहे. उरलेला मोहर फुलण्यासाठी देवगडच्या आंबा बागायतदारांना अजून दोन आवठवड्यांची वाढ पाहावी लागत आहे. हजारो रुपये खर्च करुनही अपेक्षित मोहर न आल्याने आंबा बागायतदार सध्या चिंतेत आहे. यातच जर पुन्हा लॉकडाऊन घोषित झाल्यास देवगडमधील आंबा बागायतदार पूर्ता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यंदाही अवकाळी पावसामुळे देवगड आंब्याचे उत्पादन एप्रिल उजाडला तरी अद्यात मुबलक प्रमाणात बाजारात दाखल झाले नाही. तसेच अवकाळी पावसामुळे पिकलेले आंबे आतून खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा पर्यायी फायदा रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी आंब्याला होताना दिसतोय. कारण देवगड हापूस अद्यात बाजारात दाखल न झाल्याने रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी हापूसची खरेदी सध्य़ा मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु देवगड आंबा उशारी बाजारात दाखल होत असला तरी उत्पादक यातून फवारणी, पॅकिंग, मजूरी, ट्रान्सपोर्ट असा खर्च काढून एक पेठी ४५०० रुपयांपर्यंत विक्री करतोय. परिणामी देवगड हापूस आंबा यंदा महागला आहे.
गेल्यावर्षी आंबा उत्पादकांचे लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान
गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे देवगडमध्ये आंब्याचे अपेक्षिक पीक असतानाही अनेक अडचणी आल्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले. कोरोनाच्या भीतीने कोकणातून आंब्याचा ट्रक भरून नेण्यास कोणत्याही ट्रन्सपोर्ट कंपन्या, ट्रक मालक तयार नव्हते. त्यामुळे कोकणातून हातावर मोजक्या इतक्या आंब्याच्या गाड्या मुंबईत दाखल झाल्या. यात कोकणातून मुंबई गाठेपर्यंत होणारी कडक चेकिंग, कोरोना टेस्ट आणि इतर निर्बधांमुळे १८ तासांहून अधिक तास लागत होते. यात हजारो किंमतीचा आंबा उत्पादन खराब झाला. रात्री लोड केलेला आंब्याचा माल दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंतही ग्राहकांपर्यंत पोहचणे अवघड झाले होते. यात ट्रकमधील आंबाच्या मालाला बसलेल्या उन्हाच्या झळांमुळे लाखो रुपयांचा माल जळून खराब झाल्याच्या घटना घडल्या. याची नुकसान भरपाई ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून देण्यात आली नाही. त्यामुळे आंबा उत्पादन तयार झालेले असतानाही ग्राहकांपर्यंत पोहचण्याआधीच खराब झाला. याचा आर्थिक फटका आंबा उत्पादकासह विक्रेत्याला सहन करावा लागला. त्यामुळे शासनाने कोकणातील आंबा बागायत शेतीला विमा संरक्षण द्यावे अशी मागणी देवगडमधील आंबा उत्पादक करत आहेत. कडक निर्बंधांमुळ आंबा निर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. परिणामी कोकणातून परदेशात किंवा इतर राज्यात आंबा वाहतूक करताना दुप्पट खर्च करावा लागला. तयार झालेल्या आंब्याच्या पेट्या खराब झाल्या. त्यामुळे आंबा उत्पादक आणि विक्रेत्याला नफ्यापेक्षा तोटाच अधिक सहन करावा लागला.