Crop insurance | बीड – पीक विमा उचलणाऱ्या यादीत बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक लागतो. मात्र, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारी पीकविम्याची रक्कम कंपनीने थकवली आहे. यावरून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. याप्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून तत्काळ विम्याची रक्कम वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी विनंती मुंडे यांनी केली आहे.
पंकजा मुंडे यांनी आज ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केली. त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, “बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम विमा कंपनीने थकवण्याचे कारण काय? नियमाने ऑनलाईन पीक विमा भरून देखील अतिवृष्टीच्या अडचणींचा सामना करत असताना त्यांचा विमा थांबवणे १००% अयोग्य आहे. विमा कंपनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांची विम्याची रक्कम त्वरित वर्ग करण्यास सांगावे.”
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याबदल्यात विम्याची रक्कम अत्यल्प मिळाली आहे. तसंच, ऑक्टोबर 2021 मधील अतिवृष्टीची मदत शासनस्तरावरुन वितरीत करण्यात यावी, ज्यांना विमा मिळाला नाही, त्यांना विम्याची रक्कम तत्काळ देण्यात यावी, शेतकऱ्यांना सिंगल फेज वीज पुरवठा नियमित देण्यात यावा, कापसाला दहा हजार रुपये आणि सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विटंल दर देण्यात यावा, दिवसाचे भारनियमन बंद करुन सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत शेतीला वीजपुरवठा देण्यात यावा या मागण्यांसाठी काल बीडमध्ये रास्ता रोकोही करण्यात आला होता.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम विमा कंपनीने थकवण्याचे कारण काय ?
नियमाने ऑनलाईन पीक विमा भरून देखील अतिवृष्टीच्या अडचणींचा सामना करत असताना त्यांचा विमा थांबवणे १००% अयोग्य आहे.
(१/२)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 11, 2023
शेतकऱ्यांच्या या अडचणी पंकजा मुंडे यांनी ट्वीटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आता तरी याप्रकार मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार हे पाहावं लागणार आहे.