क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला अटक करणारे दोन्ही अधिकारी एनसीबीचे नसल्याचा आरोप राष्ट्रवादी प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. एनसीबीनेही खुलासा करत किरण गोसावी आणि मनीष भानुशाली अधिकारी नसल्याचे स्पष्ट केलं आहे. भाजपचा उपाध्यक्ष असलेला मनीष भानुशाली कारवाईत कसा असा सवाल मलिक यांनी केला होता. यावर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीन वाखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही सर्व कारवाई कायद्याच्या चौकटीत केली असल्याचे वानखेडे यांनी सांगितले आहे. तसेच कारवाईदरम्यान पंचनामा करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. कायद्याच्या चौकटीत क्रूझवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुराव्यांचाही पंचनामा हा कायद्यानुसार करण्यात आला आहे. ज्या ९ लोकांनी हा पंचनामा केला त्यांची देखील नावे देण्यात आली असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई करु
नवाब मलिक यांच्या आरोपावर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे की, आम्ही सरकारी कर्मचारी चोख कर्तव्य बजावतोय. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर एनसीबी कारवाई करेल. एनसीबी ही एक व्यावसायिक संस्था आहे. आम्ही केलेल्या कारवाईमधून सगळं स्पष्ट आहे. मागील एक वर्षात महाराष्ट्रात अनेक ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. एका वर्षात आतापर्यंत एकूण ३२० जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ड्रग्जच्या दोन मोठ्या कारखान्यांवर धाडी टाकल्यात आणि ड्रग्ज माफियांना अटक करुन उघड केल असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
आम्ही जी कारवाई करत आहे आणि कारवाईतून येणारी आकडेवारी हेच आमचे सगळ्यांना उत्तर आहे. राज्यातील ड्रग्ज तस्करी संपवणे आणि महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणे आमचा उद्देश आहे. आतापर्यंत एनसीबीने एका वर्षात १०० कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त केले आहेत.
आर्यनविरोधातले पुरावे कोर्टासमोर
आर्यन खान प्रकरणात कोर्टासमोर सगळे पुरावे सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक करण्यात आले असून कारवाई सुरु असल्याचे वानखेडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : एनसीबीच्या कारवाईत भाजप कार्यकर्त्यांचा समावेश :नवाब मलिक