एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणाती कारवाईमध्ये आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरूख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप पंच किरण गोसावी याचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने केला आहे. या वसुलीमध्ये ८ कोटी समीर वानखेडे यांचे होते असा दावा साईलने केला आहे. प्रभाकर साईलच्या वक्तव्यावर फरार असलेल्या गोसावीने प्रतिक्रिया दिली आहे. प्रभाकर साईल राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी दिलेल्या आमिषाला बळी पडला असल्याचा आरोप गोसावीने केला आहे. साईलला विरोधात बोलण्यासाठी पैसे देण्यात आले असल्याचे गोसावीने म्हटलं आहे.
कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी केल्यानंतर आर्यन खानला पकडून एनसीबी कार्यालयात आणणारा किरण गोसावी सध्या गायब आहे. पोलिसांनी गोसावीविरोधात लूकआउट नोटीस जारी केली आहे. गोसावी सध्या लखनऊमध्ये असून त्याने लखनऊमध्ये आपण पोलिसांच्या स्वाधीन होणार असल्याचे म्हटलं होते. दरम्यान एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोसावीने म्हटलं आहे की, बॉडिगार्ड साईल प्रभाकरने २५ करोड रुपये वसुली आणि विमान प्रवासाबद्दल जी काही माहिती दिली आहे. ती सगळी खोटी आहे. त्याच्या माहितीमध्ये तथ्य नाही. उलट साईलचे मोबाइल लोकेशन आणि कॉल रिकॉर्ड तपासले पाहिजेत.
गोसावीने पुढे म्हटलं आहे की, साईलने जी काही माहिती दिली आणि आरोप केले आहेत. त्यामधील काहीच खर नाही आहे. त्याने केलेल्या आरोपाची चौकशी करण्यात यावी. केपी गोसावीने सांगितले की साईलचा व्हिडिओ जबरदस्ती शूट करण्यात आला आहे. त्याच्यासोबत दोन भाऊ होते. साईलला देखील ऑफर देण्यात आली आहे.
नवाब मलिकांकडून ऑफर
किरण गोसावीने दावा केला आहे की, प्रभाकर साईलला नवाब मलिकांकडून एक फ्लॅट देण्यात येणार आहे. तसेच पैसेही देण्यात येणार आहेत. सोलापुरमध्ये काही पैशांचा व्यवहार झाला. त्याचा फोटा आल्यामुळे नाव चर्चेत आले. त्यानंतर त्याला फोन करुन त्रास देण्यात येत होते. विरोधात बोलण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत होता. काही ऑफरचे फोन साईलला येत होते असे किरण गोसावी याने म्हटलं आहे.
हेही वाचा : आर्यन पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे NCBचा जामीनाला विरोध; ३८ पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल