खुनाला दहा वर्षे होऊनही डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट असून त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दहा वर्षे सतत केलेल्या आंदोलन उपक्रमामुळे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची विचारधारा, संघटना आणि त्यांचे पाठीराखे कोण आहेत, याची जाणीव सर्व जगाला झाली आहे, असे सरकार, तपास यंत्रणेला सूचित करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (Dabholkars killers are free known to the world Avinash Patil targets government investigative system)
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एस एम जोशी सभागृह येथे विवेक निर्धार मेळावा झाला. यावेळी अविनाश पाटील बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, रझिया पटेल, महा.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बागवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतिहासात राजा किंवा नेता मारला गेला की राज्य, पक्ष किंवा संघटना संपून जाते. परंतु, महा. अंनिसच्या बाबतीत तसे घडले नाही. डॉ. दाभोलकरांच्या खूनाला दहा वर्षे होऊनही संघटनेचे काम थांबले नाही. संघटना ताकदीने उभी राहिली. या सारखे देशात मागील पन्नास वर्षाच्या काळात दुसरे उदाहरण नाही, असेही अविनाश पाटील म्हणाले.
डॉ. पुनियानी म्हणाले की, कुठलाही धर्म धोक्यात नसतो, धोक्यात असते ती काही लोकांची सत्त्ता. ज्याला ते धर्माच्या आधारे मिळवतात. स्वातंत्र्य लढ्यात फुले, गांधी, नेहरू, आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टी असलेली समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्य आपणाला दिली. याच्या विरोधात दुसऱ्या बाजूला धर्म, द्वेष आणि विषमतेवर आधारित मूल्यांचा प्रसार करण्यात आला. डॉ. दाभोलकरांचा खून देखील अशी मूल्य जपणाऱ्या विचारसरणीतून करण्यात आला आहे’.
हेमंत देसाई म्हणाले, ‘देशात धर्म आणि राजकारण यांची युती झाली आहे. यातून धर्मवादास पाठबळ दिले जात आहे. सरकारे केवळ सन साजरे करण्यासाठी स्थापना झाली आहेत का? सत्य आणि अहिंसा ही कचऱ्यात टाकलेली मूल्य बनली आहेत. ती रुजविण्यासाठी शंभर दाभोलकरांची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल विमल यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या कामांचे निर्धार व्यक्त केले. विजय नांगरे, अनिल करवीर, भास्कर सदाकळे, निर्मला माने, अमोल वाघमारे, प्रतीक जाधव, केशव कुदळे यांनी गाणी सादर केली. घनश्याम येणगे यांनी आभार मानले.
डॉ. दाभोलकर हत्येचा तपास भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच जबाबदार
डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सुरूवातीपासूनच पूर्वग्रहदूषितपणा ठेऊन एकांगी आणि राजकीय विचारांनी केला गेला. अध्यात्माचा प्रसार आणि सामाजिक कार्य करणार्या सनातन संस्थेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला गेला. ‘दाभोळकरांचा खून सनातनच्या साधकांनी केला आहे’, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितल्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला. या प्रकरणात सनातनच्या 700 हून अधिक साधकांच्या पोलीस चौकशा केल्या; मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. तपासाला प्रारंभ होण्यापूर्वीच ‘आरोपी कोण’ हे प्रथम निश्चित करण्यात आले आणि त्या दृष्टीने तपास करून खोटे-नाटे पुरावे गोळा करण्यात आले. त्यात पुढे दोनवेळा आरोपी आणि साक्षीदार बदलण्यात आले. त्यामुळे दाभोळकर हत्येचा तपास हा पूर्णपणे भरकटलेला असून त्याला दाभोळकर कुटुंबीय आणि तत्कालीन नेतेच जबाबदार आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने ‘तथाकथित विवेकवादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: प्रचार आणि वास्तव’ या विषयावर आयोजित विशेष संवादात ते बोलत होते.
या वेळी राजहंस पुढे म्हणाले की, लोकांना डॉ. दाभोलकर यांचा ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्ट’ माहिती आहे; पण त्यांचा ‘परिवर्तन’ नावाचाही ट्रस्ट आहे, ज्यात त्यांच्या परिवारातील बहुतांश सदस्य ट्रस्टवर आहेत. हा ट्रस्ट खर्या अर्थाने त्यांचा ‘परिवार’ ट्रस्ट आहे. ही माहिती समाजात उघड झालेली नाही. काश्मिरला भारताचा भाग न दाखवणार्या ‘स्वीस एड फाउंडेशन’ या विदेशी संघटनेकडून या ‘परिवर्तन ट्रस्ट’ला सेंद्रिय शेतीच्या नावाखाली कोट्यवधीच्या देणग्या येत होत्या. सेंद्रिय शेतीचा आणि दाभोळकरांचा काडीमात्रही संबंध नव्हता. तसेच वृत्तपत्र चालवणार्या संस्थेला विदेशांतून देणग्या घेता येत नाहीत, असा कायदा असूनही ते विदेशी देणग्या घेत होते. या संदर्भात तक्रारी केल्यावर डॉ. दाभोलकर यांच्या ट्रस्टचा ‘एफ.सी.आर्.ए.’ परवाना सरकारने रद्द केला. तसेच आधीच्या अंनिस ट्रस्टमध्येही अनेक खोटे व्यवहार झाले होते. त्यामुळे त्यावर प्रशासक नेमण्याची शिफारस धर्मादाय कार्यालयाने केली होती. या सर्व प्रकारामुळे अंनिस ट्रस्टवर असणार्या अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची बदनामी झाली होती. जर डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली नसती तर, आज ते तुरुंगात असते; कारण दाभोलकर यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे आमच्याकडे भक्कम पुरावे होते, मात्र त्या वेळी दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. या आर्थिक घोटाळ्यांतून वा त्यांच्या संघटनेचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधातूनही त्यांची हत्या झालेली असू शकते, या दिशेने तपास का करण्यात आला नाही ? असा प्रश्नही श्री. राजहंस यांनी उपस्थित केला.
जिहादी आतंकवादाचे चित्र सर्वत्र दिसत असतांना कुठे तरी अल्पसंख्यांकांची मतपेटी वाचावी, यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने वर्ष 2006 नंतर ‘भगव्या आतंकवादा’चे चित्र निर्माण केले. प्रथम मालेगावमध्ये हिंदूंना गोवण्यात आले. ‘गांधी हत्येनंतर या देशात केवळ दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्याच हत्या झाल्या आणि त्या हिंदुत्ववाद्यांनीच केल्या’ असा प्रचार अजूनही चालू आहे. हा प्रचार आणि चर्चा सुरू ठेवत जिहादी आणि साम्यवादी यांनी देशभर केलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या हत्यांविषयी पांघरुण घालायचे, असे एक षड्यंत्र देशात सुरू आहे. त्यात सनातन संस्थेचा नाहक बळी देण्याचा प्रयत्न चालू आहे, असेही श्री. चेतन राजहंस चर्चासत्राच्या अंती म्हणाले.
( हेही वाचा: महिला सक्षमीकरणासाठी मुंबईतील 24 वॉर्डात महिला बचतगटांसाठी आठवडी बाजार )