नाशिक : शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर ३५० वर्षांनंतर ढोल-ताशांचा आवाज घुमवणारे व पाच विश्वविक्रम करणार्या सिंहगर्जना ढोल-ताशा पथक चांगलेच प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या पथकाने आजवर पाच विश्वविक्रम केले असून, जिल्ह्यातील अवघड अशा हरिहर किल्ल्यावर वादन केले आहे. गल्ली ते दिल्लीच्या तख्ताला हादरवणार्या शिवरायांच्या दुर्गराज रायगडावर दरवर्षी होणार्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यात वादनाचा विशेष मान सिंहगर्जना पथकाला मिळतो, अशी माहिती अशी माहिती पथकाचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रितम प्रेमराज भामरे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली. (World record-breaking ‘Singhgarjana Yuva manch’ Dholtasha pathak, Nashik)
भामरे पुढे म्हणाले की, १९ फेब्रुवारी २०१६ रोजी शिवजयंतीच्या दिवशी नवीन नाशिकमधील उत्तमनगरात सिंहगर्जना पथकाची स्थापना झाली. शिवजयंती, गणेशोत्सव, सण-उत्सवांमध्ये वादन करत सिंहगर्जना पथक संस्कृतीची जोपासना करत आहे. याशिवाय, सिंहगर्जनातर्फे गड-किल्ल्यांवर वादन करत शिवरायांच्या कार्याला सलाम केला जातो. प्रतापगड किल्ल्यावर मशाल महोत्सव वीर जिवा महाले जयंती साजरी करत सिंहगर्जना पथकाने गडकिल्ल्यांवर वादन करणारे पथक म्हणून ओळख निर्माण केली आहे. साल्हेर, रामशेज किल्ल्यावर ५ वेळा, सिंहगड, जंजिरा, हरिहर व रायगडावर ६ वेळा, प्रतापगड या किल्ल्यावर २ वेळा वादन केले आहे.
कळसुबाई शिखरावर २ वेळा वादन केले आहे. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व मावळ्यांच्या अपमानास्पद वागणुकीला कायमची बंदी करावी, या मागणीसाठी विशेष पाऊले या पथकाने उचलली आहेत. ढोलच्या एका पानावर किल्ले वाचवा इतिहास वाचवा, मावळा आपला अभिमान, असे संदेश असून, त्याद्वारे जनजागृती केली जात आहे. पथकामध्ये २०१६ मध्ये ३५ वादक होते. आता ८० वादक आहेत. मावळी पगडी, गळ्यात कवड्यांची माळ, कपाळी भंडारा, चंद्रकोर असा सिंहगर्जना पथकाचा पोशाख आहे. पथकात अनेक वाद्यांचे मिश्रण असून, ढोल-ताशासोबतच संबळ, मृदंग, डमरू, दिमडी ही वाद्यही आहेत. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत शनैश्वर युवक समितीतर्फे वादन केले जाते. पथकात आयटी, इंजिनीअर, वकील क्षेत्रातील तरुण व तरुणी आहेत. सिंहगर्जनातर्फे कोरोना काळात अन्नदानसह गरजूंना संसारोपयोगी किराणा किट्सचे वाटप करण्यात आले.
असे आहेत पाच विश्वविक्रम
- महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखरावर सिंहगर्जना पथकातर्फे २०१७ आणि २०२१ मध्ये वादन
- जंजिरा किल्ला येथे २०१८ मध्ये थेट समुद्रात वादन करणारे पहिले सिंहगर्जना पथक
- २०१९ मध्ये सर्वात उंच किल्ला असलेल्या साल्हेर येथे वादन
- नाशिक जिल्ह्यातील ट्रेकसाठी आव्हानात्मक असलेल्या हरिहर किल्ल्यावर २०२० मध्ये पथकाने केले वादन
- दुर्गराज रायगड किल्ल्यावर ६ जून २०२३ रोजी छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनी ३५१ ध्वज सलामी देत पथकाने केला विश्वविक्रम
मावळ्यांच्या सन्मानासाठी मोहीम
मावळ्यांच्या पोशाखात अनेक हॉटेल, लग्न समारंभात उपस्थितांचे स्वागत केले जाते. हे प्रकार बंद व्हावेत, ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले त्यांचा सन्मान राखला जावा, हॉटेल-लग्न समारंभात मावळ्यांच्या पोशाखावर बंदी असावी, या मागण्यांसाठी पथकाने राज्यभर मोहीम सुरु केली आहे. याबाबत प्रितम भामरे यांनी मुख्यमंत्री, उदयनराजे भोसले व युवराज संभाजीराजे छत्रपती, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यातही तांत्रिक अडचण येत असल्याने ही लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रितम भामरे जनजागृती करत आहेत.
सिंहगर्जना पथकात आहेत २५ ताल
नाशिक ढोलमधील वादक तालबद्ध व लयबद्ध वादन करतात. या पथकात २५ हून अधिक ताल आहेत. यंदा कलालेश्वर हा नवीन ताल बसविण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींची घेतली भेट
२०१७ रोजी सिंहगर्जना पथकाने थेट संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी ढोल-ताशाबद्दल माहिती देण्यात आली.