मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे रविवारी (ता. 26 नोव्हेंबर) भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या हिंदुह्रदयसम्राट या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबदद्ल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153 (अ), 153 (ब), 153 (अ), सी, 294, 504, 505 (1) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आली. यानंतर ठाकरे गटाकडून तातडीने दळवी यांना जामीन मिळावा, याकरिता धावपळ करण्यात आली. (Datta Dalvi expressed his opinion as soon as he came out of jail)
हेही वाचा – Datta Dalvi : दत्ता दळवी यांना न्यायालयाचा दिलासा; मुलुंड कोर्टाकडून जामीन मंजूर
अखेरीस दोन दिवसांनंतर दत्ता दळवी यांना मुलुंड न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलुंडच्या दंडाधिकारी न्यायालयाने काही अटीशर्ती आणि 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. पण ज्या दिवशी दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली त्या दिवशी काही अज्ञातांकडून त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले दत्ता दळवी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. माझे वाय 71 असले तरी आमच्यात शिवसेनेचे रक्त आहे. माझी गाडी फोडली तेव्हा मी असतो तर दोघांना तरी लोळवले असते. मी जेलमध्ये असताना ते कोणाला भेटले, कुठे बसले होते मला माहीत आहे. असे करून काय होणार? समोरच्यांची ही भ्याड वृत्ती आहे. आमच्या कुटुंबाला ही वेळ नवी नाही. शिवसेनाप्रमुखांनी घडवले, शिवसैनिक सदैव सोबत असतात. जेलमध्येही व्यवस्था केली होती, असे दत्ता दळवी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
अटक केल्यानंतर दोनदा पक्षप्रमुखांनी फोन केला होता, त्यावेळी आम्ही सगळे तुमच्या पाठिशी आहोत असं त्यांनी आश्वासन दिलं असल्याचं दत्ता दळवी म्हणाले. आता तुरुंगातून सुटल्यानंतर मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांच्याकडून देण्यात आली आहे. तर ते तुरुंगातून बाहेर येण्याआधी संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केला होता. पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर यांच्यावर दबाव आणून ज्या गुन्ह्यांमध्ये सरळ जामीन मिळू शकतो, अशा गुन्ह्यांमध्येही राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचे आणि आमच्याकडे सत्ता आहे असे सांगायचे. पण आम्ही ही सत्ता राजकीय विरोधकांच्या विरोधात कशी वापरू शकतो, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. पोलिसांनी स्वतःची बाजू न्यायालयात वेळेत मांडू नये म्हणून दबाव टाकला जात आहे. तर या ना त्या मार्गाने न्यायालयावर दबाव असे करुन कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचे, असे राऊतांकडून सांगण्यात आले होते.