राज्य मंत्रिमंडळांची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आज मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकणारे निर्णय नाहीत, असा खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतलेले निर्णय
आज मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय हे उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकणारे निर्णय नाहीत. तर उगवत्या सूर्याच्या साक्षीने सरकारने जबाबदारी स्वीकारून घेतलेले निर्णय आहेत. या निर्णयांचा नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय काय?
औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता आणि पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार असल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे.
हेही वाचा : शिंदेंच्या मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय, MMRDAला ६० हजार कोटींचे कर्ज