महाराष्ट्रातील विविध प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत त्याबाबत फेक नरेटिव्ह तयार केले जात आहेत. यामध्ये काही एचएमव्हीचे ५ पत्रकार, काही राजकीय पक्ष आहेत. सर्वांनी राज्याच्या बदनामीचा घाट घातला आहे. या विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
माझ्यालेखी हे खूप महत्वाचे लोकं नाहीत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय अधिकार आहे? सरकारची आलेली गुंतवणुक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परत पाठवली आणि महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले. मला याचे आश्चर्य वाटतं की, ही गुंतवणूक जात असताना कुठलेही एचएमव्ही बोलले नाहीत. एक ट्विट सुद्धा केले नाही. महाराष्ट्राप्रती आता जी संवेदना दिसतेय ती त्यावेळी कुठे गहाण होती याची कल्पना नाही. पण त्यांनी मी दोष देणार नाही. ते माझ्या लेखी खूप महत्वाचे लोकं नाहीत. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
विविध प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत त्याबाबत फेक नरेटिव्ह तयार केले जात आहेत. यात पहिला फॉक्सकॉन…. फॉक्सकॉनबाबत मी यापूर्वी सगळं सांगितलं आहे, पण तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले होते की, फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. हे उद्धव ठाकरेंच्या काळातचं म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री सुभाष देसाईंना माहित होत की, हा प्रकल्प येत नाही, गेलेला आहे, मग ज्यावेळी हा प्रकल्प गेला त्यावेळी देसाई, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने अशी भूमिका घेतली की, हा प्रकल्प आत्ताच्या सरकारच्या काळात गेला? म्हणजे पहिला फेक नरेटिव्ह फॉक्सकॉनच्या बाबतीत करण्यात आलं. आणि शिंदे फडणवीस सरकाराच्या काळात फॉक्सकॉन प्रकल्प गेल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी तत्कालीन उद्योगमंत्री देसाईंनी केलेल्या विधानाच्या विविध वृत्तसंस्थेच्या बातम्यांची कात्रण दाखवली.
फडणवीस पुढे म्हणाले की, टाटा एअरबस प्रकल्पाला गुजरात किंवा उत्तर प्रदेश राज्यांचा पर्याय असल्याचे 23 सप्टेंबर 2021 मधील वृत्त आहे. तेव्हा कुणाचे सरकार होते? असा सवाल करत फडणवीसांनी 14 फेब्रुवारी 2022 मधील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील इंग्रजी वृत्तपत्रातील बातम्यांचा संदर्भ दिला आहे.
आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे राज्य विसरत नाही. ज्याक्षणी कळलं की, गुजरातला जाण्याचा निर्णय टाटा एअरबस करता आहे. त्याचे कारण असे की, 2016 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा टाटा आणि एअरबसचं बोलण झालं होत त्यावेळी एमओयू झाला नव्हता, त्यावेळी मी टाटांकडे गेलो आणि नागपूरला प्रोजेक्ट आणा असे सांगितले, 2021 पर्यंत फॉलोअप घेतला. त्यांच्या टीमला नागपूरची जागा दाखवली त्यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात दोघेही स्पर्धेत होतो. अशी माहितीही फडणवीसांनी दिली.
हे सरकार आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, काही निर्णय बदलत आहेत. या प्रकल्पाचे जे प्रमुख आहेत, त्यांची नाव न घेता या प्रकल्पाचे जे प्रमुख आहे त्यांनी मी माझ्या घरी सागरवर बोलवलं, विरोध पक्ष नेता असतानाही बोलवलं. त्यावेळी गुजरातला जाऊ नका असा मी सल्ला दिला. यावेळी त्या उद्योजकांनी इकडचे वातावरण उद्योगासाठी चांगले नाही असे ते म्हणाले. यावेळी तत्कालीन सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नाही किंवा एक पत्रही गेलं नाही. आत्ता प्रकल्प गेला म्हणून ओरडतं आहेत त्यांनी एक पत्र दाखवावं. या प्रकल्पासाठी जो एमओयू झाला तोही उद्धव ठाकरेंच्या काळात झाला. प्रकल्प गुजरातला जाणार तोही निर्णय उद्धव ठाकरेंच्या काळात झाला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार असताना टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरला करण्याचा प्रयत्न केला म्हणून बहुदा नंतरच्या सरकारने जाणीवपूर्वक त्यावर कोणतीही एक्शन घेतलेली नाही. असा संशय फडणवीसांनी व्यक्त केला.