भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आता राहिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबाबत ते म्हणाले नाहीत. ही वस्तुस्थिती कृपया लक्षात घ्या आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नका, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.
महारष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून भाजपचा मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. देशात फक्त भाजपच राहील आणि बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असे विधान नड्डा यांनी केले आहे. या विधानावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे.
या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शिवसेना संपली आहे, असे नड्डा यांनी कुठेही म्हटलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता राहिलेली नाही. त्यासंदर्भात ते बोलले आहेत. आता जी नवीन शिवसेना आहे तिचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत, असेही ते म्हणाले.
तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही पूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर सुरू आहे. त्यांच्याबाबत न्यायालयच पुढचा निर्णय घेईल. याबाबत मी काही बोलू शकत नाही, असे फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
हेही वाचा : फक्त संजय राऊतांनाच लक्ष्य का?, विरोधी पक्षनेते अजित पवारांचा सवाल