मुंबई (प्रेमानंद बच्छाव) : राज्यात काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या वनक्षेत्रात वाघांचे मृतदेह सापडत असल्याची माहिती समोर येत होती. ज्यामुळे या वाघांचे मृत्यू कसे होत आहेत? याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. अशातच आता राज्यात गेल्या 23 दिवसांमध्ये 11 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वन विभागाने आज गुरुवारी (ता. 23 जानेवारी) प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 01 जानेवारी 2025 पासून 05 वाघांचा नैसर्गिक तर 03 वाघांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. तर, अन्य 03 वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे वन विभागाने पत्रकात म्हटले आहे. (Death of 11 tigers in 23 days in Maharashtra, information of forest department)
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि वनपरिक्षेत्रात 02 जानेवारी 2025 रोजी वाघांच्या आपापसांतील हल्ल्यात मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात 06 जानेवारीला एका वाघिणीचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. या वाघाच्या शिकारीत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पांढरकवडा वनविभाग अंतर्गत वणी येथे 07 जानेवारीला एका वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून या वाघिणीचे दात, पंजे गायब असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूरच्या देवलापार वनपरिक्षेत्रात 08 जानेवारीला एका बछड्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. पण या बछड्याचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याने या सुद्धा घटनेचा तपास सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र वनक्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्रात 09 जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.
हेही वाचा… Thane : महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती
गोंदिया येथील दासगाव वनपरिक्षेत्रात 14 जानेवारी रोजी आजारपणामुळे एका वाघाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूर येथील देवलापार वनपरिक्षेत्रात 15 जानेवारीला एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सिंदेवाही वनपरिक्षत्रात 19 जानेवारी रोजी रेल्वेला धडकून अपघात झाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प शिवणी वनपरिक्षेत्रातील एका बछड्याचा 20 जानेवारीला नैसर्गिक मृत्यू झाला. तर 21 जानेवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी वनपरिक्षेत्रात एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तसेच वर्धा वनविभागातील समुद्रपूर येथे एका बछड्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असून शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वन विभागाने कळविले आहे.