कोल्हापूर – कोल्हापूरला कोकणाशी जोडणाऱ्या महामार्गांची अवस्था दयनीय झाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा-करुळ घाट-वैभववाडी-तरेळे मार्गावर दीड ते दोन फुटांपर्यंत खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसह खासगी वाहतूकदारांनाही या महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर उस वाहतूक वाढली आहे. यामुळे या मार्गांवर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. खड्ड्यात पडून अनेक उसाचे ट्रॅक्टर उलटले आहेत. आतापर्यंत या महामार्गावरून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही प्रशासनाला जाग आली नाही.
कोल्हापूर शहरापासूनच रस्ते खराब झाले आहेत. कोल्हापूर शहरापासून सुरू झालेले खड्डेमय रस्ते पुढे ९० किमीपर्यंत आहेत. वैभववाडीपासून तरळ्याला जाईपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था दिसते. तळेरे बसस्थानकापर्यंत हे खड्डे आढळतात.
मुंबईहून कोकणात जाण्यासाठी अनेकजण कोल्हापूर मार्गाचा वापर करतात. मुंबई-गोवा महामार्गाची दूरवस्था झाल्याने कोल्हापूर मार्गे कोकणात जाणे सोयीचे पडते. मात्र, या मार्गांवरही आता खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने कोकणवासियांनी सुखरुप गावी कसे पोहोचायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अनेकांनी पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास सुरू केला आहे. विविध ठिकाणी घाट खचणे, साईट पट्ट्यांची दुरवस्था, मोठाले खड्डे, पावसाच्या पाण्यात रस्ते वाहून जाणे, असे विविध प्रकार घडत असल्याने या मार्गांवरून प्रवास करताना कोकणवासियांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.