महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही जिल्ह्यांवर दावा सांगितला आहे. बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. सोलापूरमधील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येथील गावकऱ्यांनी बोम्मईंना फॅक्सही पाठवल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील एकाही गावच्या जमिनीचा तुकडाही कर्नाटकाला जाऊ नये म्हणून राज्यसरकार जोरदार प्रयत्न करत आहे. परंतु जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर गावकऱ्यांनी बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असो, अशा घोषणा दिल्या आहेत.
आम्हाला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नाही. म्हणूनच वैतागून आम्ही कर्नाटकात सामील होण्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, त्यांना फॅक्सही पाठवला आहे. कर्नाटकात सामील झाल्यावर सर्व सुविधा देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, असं या ग्रामस्थांनी सांगितलं आहे.
सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्या मतदारसंघात होतो. मात्र मुख्यमंत्री असूनही त्यांनी आमच्या गावांचा विकास केलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही २८ ते ३० गावांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्याचीही दखल राज्यकर्त्यांनी घेतली नाही. जर लोकप्रतिनिधी, प्रशासन आमची दखलच घेणार नसतील तर आम्ही राज्यात राहू कशाला? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : प्रस्थापितांशी संघर्ष करत लढा द्या, राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना आवाहन