मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे 6 डिसेंबर रोजी मुंबईतील सर्व शासकीय कार्यालये सुरू असतात. या दिवशी सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणे शक्य होत नाही. त्यामुळे महापरिनिर्वाणदिनी मुंबईतील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
भारताचे उद्धारक, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अर्थात येत्या ६ डिसेंबर रोजी राज्य सरकारने मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी लेखी मागणी मी मा. मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde यांना केली आहे.
दरवर्षी… pic.twitter.com/TvxSR214sQ
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 9, 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी आणि गरीब, दलित तसेच मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमी येथे दाखल होत असतात. तसेच या दिनाचे औचित्य साधून बाबासाहेब आंबेडकर यांचा समता आणि न्यायाचा विचार घेऊन राज्यासह मुंबईच्या अनेक भागांत विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी होतात. मात्र, या दिवशी मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, आस्थापना सुरू असल्याने या कार्यालयांत काम करणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करणे शक्य होत नाही, असे वर्षा गायकवाड यांनी या पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी स्वतःचे राजकीय मूल्यमापन काय हे समजून घ्यावे; दरेकरांचा हल्लाबोल
राज्यात 6 डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी अनुसूचित जाती-जमाती शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच राज्यातील अनेक संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने देखील यादिवशी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची शिफारस शासनाला केली आहे. त्याचा विचार करून तसेच आणि आंबेडकरी जनतेच्या भावनांची त्वरित दखल घेऊन या दिवशी मुंबईतील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.