मुंबई : केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासह हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. स्वामीनाथ यांना यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर याची घोषणा केली. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत एक महत्त्वाची पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हिंदूह्रदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न घोषित करा, अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे. (Declare Balasaheb Thackeray as Bharat Ratna, Raj Thackeray’s demand)
हेही वाचा… Bharat Ratna : राम मंदिराच्या लढ्यातील दोन्ही शिलेदारांना भारतरत्न; वाचा सविस्तर…
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत पक्षाची आणि स्वतःची भूमिका वेळोवेळी स्पष्ट करत असतात. आज केंद्र सरकारने घोषित केलेल्या ‘भारतरत्न’बाबत त्यांनी पोस्ट करत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एम. एस. स्वामीनाथन यांना ते हयात असताना नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ज्याबाबत आता राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता, असे मत राज ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
तर याच पोस्टमधून राज ठाकरे यांनी देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, अशी मागणी केली आहे. ज्या दिवशी त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात येईल, तो अनेकांसाठी अत्यानंदाचा क्षण असेल, असे भावना त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये त्यांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो जोडला असून ही पोस्ट त्यांनी पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग केली आहे.
काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट?
“माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव, दिवंगत चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामीनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस. स्वामीनाथन यांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झाले. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. बाकी पी. व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलेच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवे. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. दिवंगत बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आला आहे, अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.”
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा… pic.twitter.com/2V4niOX7Au
— Raj Thackeray (@RajThackeray) February 9, 2024