राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आता कोसळले आहे. राज्यात सत्तापालट झाली असून शिंदे गट आणि भाजपचे सरकार आले आहे. नवीन समीकरणं राज्यात उदयास आली आहे. शिवसेनेच्या आमदारांसोबत खासदारही आता बंडखोरी करण्याच्या रडारवर आहेत. दरम्यान, आम्हाला परत बोलवायचं असेल तर तुम्हाला भाजपशी चर्चा करावी लागेल, असं शिवसेनेचे बंडखोर नेते आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बजावलं आहे.
दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मुलीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर त्यांना परत आणताना त्यांच्या कुटुंबप्रमुखाची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्याशीही चर्चा करावी लागते. आता भाजप आणि शिंदे गटाची युती झाली आहे. सरकार सुद्धा स्थापन झालं आहे. त्यामुळे आम्हाला परत बोलवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपशीही चर्चा करावी लागेल. फक्त आमच्याशी चर्चा करून चालणार नाही असं, दीपक केसरकर म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज ठाण्यातील जवळपास ६० हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर नवी मुंबईतील नगरसेवकांनी सुद्धा शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. राज्यात काही दिवसांमध्ये महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागणार आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होणार, कोणाला कोणती खाती मिळणार?