कोकणातील नाणार रत्नागिरीतील बारसू येथे उभारण्यात येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात वातावरण तापलेले आहे. रिफायनरीचा प्रकल्प बारसूमध्ये करण्यात येऊ नये यासाठी बारसू सोलगावातील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांची आज (ता. 07 मे) उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तर त्यांनी या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केले. पण आता शिवसेनेकडून (शिंदे गट) ठाकरेंच्या या दौऱ्यावर टीका करण्यात येत आहे. उद्योग मंत्री यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा – बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
“कोकणात रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि येथील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, ही शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका आहे. मात्र, राजापूरमध्ये जाऊन उद्धव ठाकरे विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांचा विरोध सुरू आहे”, असे म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
तसेच, “उद्धव ठाकरेंनी स्वत: बारसूतील जागेची शिफारस केली होती. याबाबत त्यांच्याकडून केंद्र सरकारला पत्र देण्यात आले होते. त्यामुळे आधी मागणी करायची आणि नंतर त्यालाच विरोध करायचा, असा प्रकार महाराष्ट्रात प्रथमच होतो आहे. उद्धव ठाकरेंच्या याच कार्यपद्धतीवर शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्र्यात लिहिले आहे”, असे यावेळी केसरकर यांच्याकडून सांगण्यात आले.
“आपल्या डोळ्यासमोर आपल्या राज्याचे मुडदे पाडले जात असून जर त्याला विकास म्हटला जात असेल तर, अशा विकासा मी मानणार नाही आणि असा विकास होऊही देणार नाही. ही काही हुकूमशाही नाही. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर, ही हुकूमशाही तोडून-मोडून टाकीन आणि महाराष्ट्र पेटवून यांना हकलवीन”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.
तर, “निवडणुका तोंडावर आल्यानंतर पंतप्रधानांपासून सर्वच जण येथे प्रचाराला येतील. आज मी जन की बात ऐकायला आलोय, मन की बात करायला आलेलो नाही. त्यामुळे आपल्या शिवसेनेबद्दल विश्वास कायम ठेवा. माझे राज्यकर्त्यांना आव्हान आहे की, त्यांनी बारसूत येऊन रिफानरीचे समर्थन करून दाखवावे”, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी आज बारसूमधून केले.