सिंधुदुर्ग : युती सरकारच्या कार्यकाळात नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यानंतर या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील नाणार गावात करण्यात आलेले जमीन अधिग्रहण रद्द करण्यात आले. परंतु, आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक विधान केल्यानंतर याबाबत महायुतीतच बेबनाव असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राणेंच्या विधानाला दुजोरा दिल्याने यावरून माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सामंत यांना टोला लगावला आहे. (Deepak Kesarkar taunts Uday Samant over Nanar Refinery statement)
रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार नारायण राणे यांनी नाणार रिफायनरीविषयी म्हटले होते की, जर कोणती कंपनी रत्नागिरीत यायला तयार असेल तर नाणार प्रकल्प होणार, असे विधान खासदार राणे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला दुजोरा देत मंत्री उदय सामंत म्हणाले होते की, कंपनी यायला जर तयार असेल तर प्रयत्न करणार. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. चर्चा करून मार्ग सोडवू… नाणारवर लोकांनी निर्णय घ्यावा. 2019 च्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही, असे सांगितले होते. पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असे पत्र तेव्हा केंद्राला लिहिले होे. पण सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करणार, असे उदय सामंत म्हणाले.
हेही वाचा… SS UBT : संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांचा आक्रोश विचलित करीत नाही, ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा
मंत्री उदय सामंत यांच्या या विधानानंतर दीपक केसरकर यांनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का? हे तपासून पाहाव लागेल. तर उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पूर्ण जगाची माहिती आहे, असा खोचक टोलाच केसरकरांनी लगावला आहे. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पावरून एकाच पक्षातील दोन नेत्यांच्या मतांमध्ये भिन्नता असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या कोकणातील नेत्यांकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते? आणि आमदार दीपक केसरकरांच्या या टोल्याला मंत्री उदय सामंत नेमके काय उत्तर देतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.