मुंबई – मुंबईत बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाने ( Foreigners Regional Registration Office) मोठी कारवाई केली आहे. या कार्यालयाने आतापर्यंत ४५० परदेशी नागरिकांची हकालपट्टी केली असून यामध्ये ४०० पेक्षा जास्त आफ्रिका खंडातील नागरिक आहेत. धक्कादायक म्हणजे, भारतात राहता यावं म्हणून या परदेशी नागरिकांकडून छोटे मोठे गुन्हे केले जायचे. यामुळे गुन्हा निकाली लागत नाही तोवर ते भारतात वास्तव्य करू शकतील.
हेही वाचा – बापूंच्या हत्येसाठी सावरकरांनी गोडसेला मदत केली, तुषार गांधींचा मोठा खुलासा
परदेशी नागरिकांना भारतात राहता यावं याकरता त्यांना परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयात नोंदणी करणं आवश्यक असतं. यासाठी अर्ज क नमुना भरावा लागतो. या अंतर्गत संबंधित परदेशी नागरिक कुठे राहतो, याची माहिती द्यावी लागते. परंतु,अनेक परदेशी नागरिक हा अर्ज भरत नाहीत. अर्ज न भरता भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध एफआरआरओच्या मदतीने भारतीय गुप्तहेर यंत्रणेच्या मदतीने विशेष मोहीम राबवली जाते. या मोहिमेत बेकायदा राहाणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवलं जातं. तसंच, अशा बेकायकदा परेदशी नागरिकांना काळ्या यादीत टाकलं जातं. जेणेकरून अशा प्रवाशांना पुन्हा भारतात प्रवास करता येत नाही.
मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात अनेक परदेशी नागरिक राहतात. मात्र, यातील बहुतेक नागरिक भारतात बेकायदा वास्तव्य करतात. भारतात राहता यावं याकरता ते छोट्या-मोठ्या स्वरुपाचे गुन्हे करतात. जेणेकरून खटला संपेपर्यंत ते देश सोडून जाऊ शकणार नाहीत. मात्र, यांच्यावर गुप्तचर यंत्रणांकडून धरपकड सुरू झाल्याने असे गुन्ह्याचे प्रकार कमी झाले आहेत.