घरमहाराष्ट्रबेळगाव प्रश्नावर अमित शाहांशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

बेळगाव प्रश्नावर अमित शाहांशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Subscribe

बेळगाव जवळच्या टोलनाक्यावर आज कर्नाटकमधील कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला केला. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी कर्नाटकला कडक शब्दात सुनावले

मुंबई : बेळगावात आज जो प्रकार घडला, त्याबाबत मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी देखील आपण स्वत: या प्रकरणी लक्ष घालू आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेऊ आणि अशा घटना घडविणार्‍यांना सरकार पाठीशी घालणार नाही, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. संपूर्ण घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. याशिवाय हा संपूर्ण विषय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या कानावरही घालणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे सांगितले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडीचा जुना राग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कारण देऊन आघाडीकडून मोर्चाचे राजकारण करण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

बेळगाव जवळच्या टोलनाक्यावर आज कर्नाटकमधील कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला केला. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी कर्नाटकला कडक शब्दात सुनावले. कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही सारे आणि सरकार म्हणूनसुद्धा ठामपणे आहोत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

देशात संविधान आहे. संविधानाने कोणालाही कोणत्याही राज्यात जाण्याचा, नोकरी करण्याचा अधिकार दिला आहे. एखाद्या राज्यात जर याची पायमल्ली होत असेल तर त्या राज्याने हे प्रकार रोखले पाहिजेत. तसे होणार नसेल तर केंद्र सरकारकडे जावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. त्याला प्रत्युत्तर आता कर्नाटककडून देण्यात येत आहे. माझे कर्नाटक सरकारलाही सांगणे आहे की हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. असे असताना या प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्ये करणे योग्य नाही. तसेच पुढच्या ४८ तासांत बेळगावला जाण्याची वेळ शरद पवार यांच्यावर येणार नाही. कर्नाटक सरकार तसेच केंद्र सरकार परिस्थिती आटोक्यात आणेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र राज्य हे देशात न्यायप्रिय राज्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ॲक्शनला रिॲक्शन येऊ नये, असे माझे आवाहन असल्याचेही ते म्हणाले.

आघाडीचा राज्यपालांवर जुना राग

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्य तसेच इतर प्रश्नांवरून १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आणि देशाचे कायमच आदर्श राहिले आहेत. त्यावर कोणताही प्रश्नच निर्माण होत नाही. कोणाच्या चुकीच्या वक्तव्याने किंवा वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याने महाराजांचे महत्त्व कोणी कमी करू शकत नाही. राज्यपाल हे राजधानी रायगड, सिंहगड, प्रतापगड या ठिकाणी जाऊन आले आहेत. या प्रकरणाला ज्या प्रकारे हवा दिली जात आहे ते पाहता राज्यपालांवरील जुना राग काढण्याचा हा प्रकार आहे. छत्रपतींचे नाव पुढे करून आपला राजकीय अजेंडा चालविण्यात येत आहे. राग काढण्यासाठी छत्रपतींचा वापर करणे चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवछत्रपतींचा राजकारणासाठी वापर करणे चुकीचे आहे आणि कोण करते आहे तर जे छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागतात ते तसेच पुरावे मागितल्यानंतर साधी माफीही मागत नाहीत. त्यांना प्रश्न विचारण्याचा काय अधिकार आहे? असा सवालही त्यांनी केला. राज्यपालांवरील राग काढण्यासाठी आणि आपला राजकीय अजेंडा चालविण्यासाठी अशा पद्धतीने आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करणे हे अजिबात योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कायमच आमचे आदर्श होते, आहेत आणि राहतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा : महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न, घटनाबाह्य मुख्यमंत्री.., आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -