ऐन सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून मनमाडकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांमध्ये हाल झाले आहेत. इगतपुरीजवळ पुष्पक एक्सप्रेसला अपघात झाल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुष्पक एक्स्प्रेसचा डबा ट्रॅकवरुन घसरल्यामुळे मनमाडच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून ऐन दिवाळी सणात प्रवाशांना त्रासाला सामोर जावे लागत आहे.
…यामुळे वाहतूक झाली विस्कळीत
एक्स्प्रेसचा जनरल डबा रुळावरुन घसरल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला असल्याचे समोर आले आहे. पण, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचेही बोलले जात आहे. सकाळी ११.३० च्या दरम्यान ही घटना घडली असून या जनरल डब्ब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्ब्यात शिफ्ट करण्यात आले आहे. पुढच्या एका तासात वाहतूक पुन्हा पूर्ववत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी असल्याने मुंबईकर अनेक प्लॅन बनवतात. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर जातात. पण, अचानक मनमाडकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यात एक दिलासादायक गोष्ट म्हणजे मध्य रेल्वेकडून रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांचा सुखकर प्रवास होणार आहे.
हेही वाचा – खुशखबर…दिवाळीनिमित्त ‘मेगाब्लॉक’ रद्द