महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा एकदा झीज सुरु झाली असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी मूर्तीची झीज होऊ नये म्हणून करण्यात आलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया अयशस्वी ठरली असून मूर्तीच्या सौंदर्याला बाधा पोहोचली आहे.
आख्यायिकेनुसार, करवीर निवासिनी अंबाबाईची ही मूर्ती जवळपास 2 हजार वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे 2015 मध्ये मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या 100 वर्षांत देवीच्या मूर्तीला काही होणार नाही असा दावाही पुरातत्व विभागाने केला होता. मात्र रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर 2017 मध्ये देखील मूर्तीची झीज दिसून आली. शिवाय आता काही दिवसांपूर्वी पुन्हा मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले आणि रासायनिक थरही निघू लागले होते. देवीच्या मूर्तीच्या पायाचा भाग आणि गदेचे टोकही झिजल्याचं दिसून आलं होत. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच रासायनिक प्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, आता अनेक वेळा वज्रलेप केल्यानंतर मूर्तीच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले आहे. 26 जानेवारीला देवीच्या डोळ्या शेजारील भागातील कपचा निघून पडला असून मूर्तीच्या चेहऱ्याच्या काही भागाला इजा पोहोचली आहे.
का होतेय मूर्तीची झीज?
जाणकारांच्या मते, दिवसेंदिवस भक्तांची वाढती गर्दी आणि गाभाऱ्यातील तापमानामुळे मूर्तीची झीज होत आहे. मूर्तीची होणारी झीज थांबवण्यासाठी गाभाऱ्यातील तापमान कमी करुन देवीच्या पूजेसाठी जास्त फुलांचा वापर टाळला पाहिजे, पुजेसाठी गायीच्या दुधाचा वापर केला पाहिजे, तसेच देवीच्या दागिन्यांची संख्या कमी केली पाहिजे,आर्द्रता कमी करण्यासाठी गर्भकुडीतील पाण्याचा साठा कमी केला पाहिजे. अशा काही अटी पूर्वी रासायनिक पुरातत्व विभागाने रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर घातल्या होत्या.