पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. जवळपास ४०० एकरचे हे मैदान श्री सदस्यांच्या गर्दीने भरलेला दिसून आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचं कौतूक करताना हे उद्गार काढले.
नवी मुंबईतील खारघरमधल्या सेंट्रल पार्कच्या जवळपास ४०० एकर मैदानात हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. असा न भूतो, न भविष्यती असा कार्यक्रम व्हावा या हेतून जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळपासूनच श्री सदस्यांनी सेंट्रल पार्कच्या मैदानावर येण्यास सुरूवात केली. राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून बसमधून श्री सदस्य सेंट्रल पार्कच्या मैदानावर आले. खारघर शहरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी ४०० एकरच्या या भव्य मैदानात जवळपास ११० मोठ्या स्क्रिन बसवण्यात आल्या आहेत.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या इतर मंत्री आमदार आणि खासदार उपस्थित होते. जवळपास २० लाखांहून अधिक श्रीसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
ऐतिहासिक क्षण !
केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र… pic.twitter.com/xxiKmxjO0I— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 16, 2023
यावेळी उपस्थित श्री सदस्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गौरवोद्गार काढले. “जगात एकूण सात आश्चर्य आहेत, असं म्हटलं जातं. पण तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्यक्रम पाहिल्यानंतर जगात सात नव्हे तर आठ आश्चर्य आहेत, असं मला वाटतं. हे आठवं आश्चर्य हे श्री सदस्य आहेत.”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कौतूक केलंय. यापुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पैशाने माणूस धनवान होत नाही. माणसाची खरी श्रीमंती त्याच्या संस्कारामध्ये असते, असं भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे. ती खरी श्रीमंती श्री सदस्यांच्या कुटुंबात पहायला मिळते. कारण नानासाहेब आणि आप्पासाहेबांच्या विचारांची श्रीमंती घेऊन हे श्री सदस्य जीवन जगतात. आप्पासाहेबांनी त्यांच्या निरुपणाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मकता दिली.”
आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरित्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेब स्वारीना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्व आज निश्चितच वाढले आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस सांगितले.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत आहेत….
असे म्हणतात की जगात सात आश्चर्य आहे.
पण मी जेव्हा जेव्हा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांना येतो, तेव्हा मला खात्री पटते की… pic.twitter.com/lIAgsD7qcr— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 16, 2023
तसंच कपडे खराब झाले की धुता येतात. शरीरही अंघोळ करून स्वच्छ करता येतं. पण मन स्वच्छ कसं करायचं याची कला आप्पासाहेबांच्या निरुपणात आहे. यापुर्वी नानासाहेबांचा पुरस्कार घेण्यासाठी आप्पासाहेब आले होते. त्यावेळी सगळ्यात जास्त लोक त्यावेळी आहे होते. याची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा घेण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आले होते, परंतू कार्यक्रम संपल्यानंतर मैदानात कचऱ्याचा चिटोरा देखील दिसला नव्हता. हे संस्कार आप्पासाहेबांनी दिलेले आहेत, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भगवान श्रीकृष्ण यांनी श्रीमद् भगवतगीतेत माणुसकीचा धर्म सर्वात श्रेष्ठ सांगितला. मनाची श्रीमंती हीच सर्वात मोठी श्रीमंती असते. ती श्रीमंती वाढविण्याचे काम आप्पासाहेब धर्माधिकारी करीत आहेत. ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण आहेत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अंधश्रद्धा निर्मूलन… pic.twitter.com/sjoJM0VMN9
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 16, 2023
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धर्माधिकारी घराण्याची इतिहासही उघड केला. “धर्माधिकारी यांच्या घराण्याचा ४५० वर्षा पूर्वीपासूनचा इतिहास आहे. त्यांच्या आठ पिढ्यापुर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धर्म जागृतीचं काम करत होते. त्यांचं काम पाहून महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी कौतुक करत ते केवळ शांडिल्य नसून धर्माधिकारी देखील असल्याचं सांगितलं. तेव्हापासून महाराजांच्या प्रेरणेने धर्माधिकारी हे नामाबिरुद लागलं ते आतापर्यंत पिढ्यान पिढ्या धर्मजागरणाचं कार्य सुरू आहे, हे कौतुकास्पद असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे, त्यांचे आभार मानण्यासाठीच हा पुरस्कार दिला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाजकार्याबद्दल माहिती दिली. यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे आदी यावेळी उपस्थित होते.