बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसाचा पराभव झाला तरी भाजप पेढे वाढत आनंद साजरा करत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला, असी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांना गोवा विधनासभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. “बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही. बेळगावमध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. भाजपचे निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. त्यामुळे मराठी माणसाचा पराभव आणि एका पक्षाचा पराभव या दोन गोष्टी सारख्या असू शकत नाहीत, मराठी माणूस हा पराभूत होऊच शकत नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीसांवर गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपच्या हायकमांडने गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. यानंतर फडणवीसांनी माधअयमांशी बोलताना गोव्यात पुन्हा एकदा आमचं सरकार स्थापन करु, असा विश्वास व्यक्त केला.
“आमचे मंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जे काही कार्य केलं आहे त्याच्या आधारावर आम्हाला पुन्हा एकदा जनता निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे. गेली चार निवडणुकांसाठी गोव्यामध्ये गेलो आहे त्यामुळे गोव्याचा परिचय देखील माझा आहे. खरंतर या वेळेसच्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये आमचे लाडके मनोहर पर्रीकर आमच्यामध्ये नसणार आहेत. तरी देखील त्यांनी पक्षाला दिलेली दिशा आणि केलेला विस्तार, त्याच्याआधारे आम्ही निवडून येऊ,” असं फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिला आहे. महाराष्ट्र भाजप नेमची गोव्याच्या निवडणुकीमध्ये सक्रीय राहिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचं संपूर्ण सहकार्य असणार आहे. अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांची मदत मिळणार आहे. दोन केंद्रीय राज्यमंत्री देखील माझ्यासोबत तिथे असणार आहेत. आमच्या परिने पूर्ण मेहनत करुन पुन्हा एकदा गोव्यामध्ये भाजपचं सरकार स्थापन करु,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.