गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पोलीस बदल्यांतील भ्रष्टाचाराबाबतचा अहवाल फोडल्याप्रकरणी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई सायबर सेल चौकशी करत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांना कानपिचक्या दिल्या. वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं, अशा पद्धतीने नोटीसा देण्याची परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार रविवारी पुण्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांची होत असलेल्या चौकशीवर प्रतिक्रिया दिली. तसंच, त्यांनी भाजपच्या आंदोलनावर देखील भाष्य केलं. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नोटीस कशामुळे दिली? माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावं. देशात, राज्यात आपल्याकडे अशी परिस्थिती कधीच नव्हती…नोटिसा देणं, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं वगैरे. प्रत्येकानं आपापलं काम करावं. जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे, असं अजित पवार म्हणाले.
हा तमाशा कशाला? – संजय राऊत
शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर ट्विट करत भाजप आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?” असं ट्विट करत राऊतांनी भाजपवर टीका केली.
फडणवीसांची राजकीय सूडबुद्धीनं चौकशी नाही – आदित्य ठाकरे
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांच्या होत असलेल्या चौकशीवर प्रतिक्रिया देताना फडणवीसांची राजकीय सूडबुद्धीनं चौकशी नाही, असं म्हटलं. भाजपला आरोप करण्याची सवय आहे. ते सध्या नैराश्यात आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.