राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नोटबंदीमध्ये बनावट नोटांचे रॅकेट चालवण्याचे तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक आरोप केले आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील सरकारी पदांवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बसवले आणि खंडणी गोळा करण्यात आली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक मजकूर असलेला फोटो ट्विट केला आहे. यामध्ये मी खूप वर्षांपुर्वी शिकलो आहे की, डुकरांसोबत कुस्ती करु नये असं म्हटलं आहे. मात्र फडणवीस यांचा रोख हा नवाब मलिकांच्या दिशेनेच आहे.
Thought of the day 👇🏼 pic.twitter.com/PkLiHS3GVW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सरकारमध्ये घेऊन खंडणी गोळा करण्याचा प्रकार सुरु होता. नोटबंदीनंतर बनावट नोटांचं नेक्सस चालवलं आहे. रियाज भाटीच्या माध्यमातून वसुली केली असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांनी एक ट्विट शेअर करत एक सुविचार या ट्विटमध्ये शेअर केला आहे.
नवाब मलिकांच्या आरोपांकडे कानाडोळा
नवाब मलिकांच्या आरोपांवर यापुढच्या काळात देवेंद्र फडणवीस हे थेट माध्यमांसमोर किंवा समाजमाध्यमातून प्रतिक्रिया देणार नाहीत, असेच संकेत मिळत आहेत. नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने तत्काळ रणनिती आखण्याची सुरूवात केली आहे. भाजपच्या निवडक नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर झाली. त्यानुसार आता नवाब मलिकांविरोधात कोण बोलणार इथपासून ते केंद्राच्या यंत्रणा सक्रीय होण्याचे संकेत मिळत आहेत.
मलिकांविरोधात भाजपची स्ट्रॅटेजी
नवाब मलिकांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपने या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नवीन रणनिती आखली आहे. फडणवीसांच्या दिवाळीनंतरच्या बॉम्बनंतर नवाब मलिकांना पुरते घेरण्याची रणनिती भाजपने आखली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर फडणवीसांचे भाजपच्या नेत्यांकडून कौतुक करण्यात आले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कृपाशंकर सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ, नितेश राणे, राम कदम, आशिष शेलार आदी नेते हजर होते. या बैठकीत नवाब मलिकांच्या आरोपांवर कोण बोलणार हेदेखील निश्चित झाले असल्याचे कळते. महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यापुढच्या काळात नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर देणार नाहीत, अशीही माहिती मिळते आहे. या प्रकरणात नवाब मलिकांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपच्या दुसऱ्या फळीतले नेते सक्रीय झाल्याचे पहायला मिळते आहे. त्याचाच प्रत्यय हा नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर आला. आज बुधवारीही नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर दुपारी १२ वाजता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये नवाब मलिकांचे मानसिक संतुलन बिघडले आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे रियाज भाटीसोबतचे फोटो शेअर करत आशिष शेलार यांनी नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीसांचे बनावट नोटांचे रॅकेट; नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब