‘मी बराच काळ विरोधी पक्षात होतो. त्यामुळे मी सुद्धा अंगावर धावून जायचो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी स्वतःची समजूत घालून घेतली की, संयम ठेवला पाहिजे. जाणीवपूर्वक मी संयम ठेवायला शिकलो’, अशी आठवण सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष नाना पटोले यांनाही संयम ठेवण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा – बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या फेकून दिल्या असत्या – फडणवीस
अध्यक्षांनी संयम ठेवायला हवा – फडणवीस
वेलमध्ये उतरून वारंवार घोषणा देणाऱ्या विरोधकांना अध्यक्ष नाना पटोले यांनी फटकारले. तेव्हा आपल्या पक्षांच्या सदस्यांची बाजू घेताना अध्यक्षांनीही संयम ठेवायला हवा, असे सांगण्यासाठी फडणवीस यांनी स्वतःचे उदाहरण दिले. आपण गेली पाच वर्षे विधानसभेत नव्हता. आपण संसदेत होता. त्यामुळे विधानसभेच्या कामापासून आपण काहीसे दूर गेल्याचे फडणवीस यांनी पटोले यांना सांगितले. त्यावर पटोले यांनी सभागृहाच्या हौदात येऊन गोंधळ करू नये असे नरेंद्र मोदी यांनीच म्हटल्याची फडणवीस यांना आठवण करून दिली. त्यावर ‘मोदी यांनी दिलेली शिकवण आम्ही शिकत आहोत’, असे फडणवीस यांनी उत्तर दिले.
हेही वाचा – मराठीच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; विधान परिषदेतून सभात्याग
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहायला हवे
‘विरोधी पक्षनेते ज्यावेळी सभागृहात भाषण करतात, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नवीन आहेत. त्यामुळे मी समजू शकतो. परंतु येथून पुढे मुख्यमंत्र्यांनी याची काळजी घ्यायला हवी’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.