घरमहाराष्ट्र'सुदैवाने मुंबईत माझं घर नाही, अन्यथा...' फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला

‘सुदैवाने मुंबईत माझं घर नाही, अन्यथा…’ फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला

Subscribe

२०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा स्वबळावर विजय, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

‘सुद्दैवाने मुंबईत माझे घर नाही. असते तर मलाही नोटीस आली असती. नागपुरातील माझे घर नियमानुसार बांधले आहे, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शिवसेनेला लगावला आहे. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. मात्र, हे सरकार काहीही करत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारख वागल पाहिजे”, असा सल्लाही फडणवीसांनी दिला आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मुंबईतील भाजप कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला.

गेल्या काही दिवसांपासून अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबईच्या खारमधील बंगल्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. तर केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांनाही जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामांप्रकरणी महापालिकेने नोटीस धाडली होती. या नोटीसीनंतर पालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या अनेक चर्चाही माध्यमांमध्ये रंगल्या. रवी राणा आणि नारायण राणे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती. यानंतरचं ही नोटीस पाठवल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. याच मुद्द्याला धरून आज फडणवीसांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.

- Advertisement -

राज्यसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आम्ही जिंकलो ते हरले इथपर्यंत हा विषय मर्यादित नाही. पण महाराष्ट्र थांबलाय, महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी जोपर्यंत आहात तोपर्यंत राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखं वागलं पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड. सुद्दैवाने मुंबईत माझे घर नाही, असते तर मलाही नोटीस आली असती. नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच द्यावी लागेल. नागपुरातील माझे घर नियमानुसार बांधले आहे, त्यामुळे मला ठिकाणी नोटीस आली नाही. ही योग्य पद्धत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

२०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा स्वबळावर विजय

भारतीय जनता पार्टीला राज्यसभा निवडणुकीत मिळालेला विजय ही सुरुवात असून यापुढे महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत तसेच २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपा स्वबळावर दणदणीत विजय मिळवेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर अजून मोठी लढाई बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा दणदणीत विजय मिळवेल. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा स्वबळावर सरकार आणेल. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही आपल्याला यश मिळवायचे आहे. मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रात सर्वत्र भाजपाचा भगवा ध्वज फडकवायचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा उत्साह कायम ठेवावा.

ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा देत शिवसेनेसह सत्ता दिली होती. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही जी सत्ता मिळवली ती तरी चांगली चालवून दाखवा. राज्यातील विकासकामे थांबली आहेत. जे काही प्रकल्प चालू आहेत ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, प्रकल्प बंद आहेत, विजेचा तुटवडा आहे, जीएसटीचे पैसे मिळाले तरी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यास राज्य सरकार तयार नाही. महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी याचा अंतर्मुख होऊन विचार करावा.

भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी प्रकृती बरी नसतानाही मुंबईत येऊन मतदान केले त्यामुळे भाजपाचा तिसरा उमेदवार सहजपणे विजयी झाला. त्याबद्दल त्यांचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने कठोर भूमिका घेतल्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करावे लागले. मा. देवेंद्र फडणवीस यांनी अचूक रणनिती बनवून भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना विजयी केले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली. या निवडणुकीतील यशानंतर चित्र बदलेल. विधान परिषद निवडणुकीतही भाजपाला चांगले यश मिळेल.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उत्सवामध्ये भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे आणि प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचा सत्कार पक्षाचे निवडणूक प्रभारी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, आमदार तसेच कार्यकर्त्यांच्या उत्साही गर्दीत जल्लोष करण्यात आला. ढोल – ताशांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या दणदणाटात फुलांची उधळण करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.


भाजपच्या विजयाने काही लोकं बावचळले, पिसाटलेत; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -